सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवाने स्वत:च्या नावामागे राजपत्राद्वारे लावले सिंधुताईंचे नाव

‘सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील संस्थेचा कारभार पाहणारे त्यांचे खासगी सचिव विनय नितवणे यांनी स्वत:च्या नावात बदल करून राजपत्राद्वारे नावामागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले आहे. जी मुले अनाथ आहेत, अशाच मुलांच्या नावांमागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले जाते. मात्र, नितवणे यांनी अनाथ नसूनही सिंधुताईंचे नाव लावले आहे. त्यांच्या नावाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला.
‘अनाथांची माय’ बनून समाजसेवेचा समृद्ध वारसा मागे सोडलेल्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या ‘वारसदारा’वरून संघर्ष होण्याचे संकेत आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवाने स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्याचा प्रयत्न चालवल्याचा आक्षेप सिंधुताई यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी घेतला असून, त्यांनी अचलपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
‘विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत काम करावे, समाजकार्य करावे, याबाबत आमचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र, अनाथ नसतानाही त्यांनी स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावले, यावर आमचा आक्षेप आहे’, असे अरुण सपकाळ म्हणाले. नितवणे हे सिंधुताईंबरोबर राहायचे. सिंधुताईंमुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी झाल्या आहेत. आता सिंधुताईंचे नाव लावून नितवणे यांना नेमके काय साध्य करायचे आहे’, असा प्रश्नही अरुण यांनी उपस्थित केला.
‘या प्रकरणी आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने आधी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे अचलपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे’, असे सपकाळ म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार दाखल करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. सपकाळ हे सध्या चिखलदरा येथे सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या अनाथ मुलींच्या आश्रमाची व्यवस्था पाहतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत