
प्रज्वल मोरे
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कराड नगरपालिकेने मानपत्र प्रदान केल्याच्या घटनेला दिनांक ०२ जानेवारी, २०२५ रोजी ८५ वर्षे पूर्ण झाली. परंतु या ऐतिहासिक आणि दैदिप्यमान घटनेचा बहुदा कराड नगरपरिषदेला विसर पडला त्यामुळेच सनातनी पिलावळीने आपले डोके वर काढले आणि बंधुता परिषदेच्या गोंडस नावाखाली स्वयंघोषित विद्वान मंडळींना सोबत घेऊन या सनातनी मंडळींनी डॉ. बाबासाहेबांबद्दल अनेक बुद्धीभेद करणारी विधाने प्रसारित करून डॉ. बाबासाहेबांवर गरळ ओकण्याचे काम केले आहे.
सनातनवाद्यांनी आयोजित केलेल्या या बंधुता परिषदेत त्यांनी केसरी या ब्राह्मणी छावणीच्या वृत्तपत्राचा दाखला देत डॉ. बाबासाहेब हे नगरपालिकेतील मानपत्राचा स्वीकार करून पुढे भवानी मंदिर संघ शाखेस भेट देतात असा अजब दावा केला आहे. याप्रसंगी ‘ मी संघाकडे आपुलकीने पाहतो’ असे विधान केल्याचे देखील या छोट्या कात्रणातून पसरवले गेले होते.
वस्तुस्थिती अशी आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९३९ च्या डिसेंबरमध्ये एका खटल्याचे काम पाहण्यासाठी कोल्हापूरला स्वतः च्या मोटारीने गेले होते. त्यांचा कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात स्वतंत्र मजूर पक्षाची परिषद आणि सामाजिक - राजकीय कार्यासाठी हा दौरा होता. डॉ. बाबासाहेबांना कराड नगरपालिकेने मानपत्र अर्पण करण्यापूर्वी त्यांची ३ अत्यंत महत्त्वपूर्ण भाषणे झाली ती अनुक्रमे -
१. बेळगाव जिल्हा स्वतंत्र मजूर पक्षाची परिषद, दिनांक
२५/१२/१९३९.
२. कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषद, दिनांक
३०/१२/१९३९.
३. कोल्हापूरहून सातारला जाताना नेरे मुक्कामी झालेली
परिषद, दिनांक ३१/१२/१९३९.
तर बाबासाहेबांचे चौथे भाषण हे दिनांक २ जानेवारी १९४० रोजीचे कराड येथे झाले आणि याच घटनेवरून सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या प्रमाणात वैचारिक घुसळण सुरू आहे. त्या कराड येथील भाषणाचा वृत्तान्त खालीलप्रमाणे –
ता. २ जानेवारी १९४० रोजी संध्याकाळी ४ वाजता क-हाड म्युनिसीपालिटीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचे ठरविले होते. या समारंभासाठी डॉ. बाबासाहेब सातारहून सुमारे ३ वाजता जाण्यास निघाले. सातारहून १३ मैलांच्या अंतरावर गाडी नादुरुस्त होऊन पुढे जाणे अशक्य झाले. थोड्यावेळात मुंबई येथील परळ भागातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी रा. लक्ष्मणराव शेटे हे आपल्या खाजगी मोटारीतून जात असता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना क-हाडपर्यंत नेण्याचे मोठ्या आनंदाने कबूल केले. याच गाडीस क-हाडजवळ एक भयंकर अपघात झाला. सुदैवाने गाडीतील उतारु मरणाच्या दारातून वाचले. कोणासही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या नाहीत. डॉ. आंबेडकरांच्या डोक्यास, पायास व हातास मार बसला होता. गाडीतील मार लागलेल्या सर्व जणास सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी सरकारी दवाखान्यात नेले व त्यांना पट्ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेतल्यानंतर डॉ. आंबेडकर सुमारे ६ च्या सुमारास म्युनिसीपालिटीतील मानपत्र समारंभास जाण्यास निघाले. म्युनिसीपालिटीचा हॉल आतून व बाहेरून सभासदांनी व इतर नागरिकांनी फुलून गेला होता. प्रथमतः स्थानिक स्पृश्य विद्यार्थिनींनी स्वागतपर पद्ये म्हटली व समारंभास सुरुवात करण्यात आली. पद्ये म्हणून झाल्यावर रा. बहुलेकर वकील यांनी म्युनिसीपालिटीचे मानपत्र वाचून दाखविले. म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. कदम यांनी हे मानपत्र डॉ. बाबासाहेबांस अर्पण केले. मानपत्र अर्पण झाल्यावर डॉक्टरसाहेब उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी भाषण दिले सदरचा संपूर्ण प्रसंग आणि बाबासाहेबांचे मूळ भाषण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, भाषण क्रमांक १७०, खंड – १८, भाग २, पान नं.३१४ ते ३१६ वरती तसेच जनता – २० जानेवारी, १९४० च्या अंकात उपलब्ध आहे.
तर या आर.एस.एस प्रणित बंधुता परिषदेच्या संयोजकांचा असा दावा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भवानी मंदिर संघ शाखेस भेट देऊन " आमचे काही बाबतीत मतभेत असतील परंतु, मी संघाकडे मी आपुलकीने पाहतो " असे विधान केले. यांचा हा दावा कितपत खरा आहे?
डॉ. बाबासाहेबांचे हे विधान आणि बाबासाहेबांनी संघ शाखेस भेट दिल्याचा हा जो पुरावा हे लोक देत त्यात काहीच तथ्य नाहीये. कारण मी वरती जो महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, भाषण क्रमांक १७०, खंड - १८, भाग २, पान नं. ३१६ चा जो संदर्भ दिला आहे, त्यामध्ये बाबासाहेबांचा म्युनिसिपालिटीच्या सत्कार आणि भाषणानंतर ते स्थानिक महारवाड्यातील समारंभास डॉक्टरसाहेब हजर राहिले होते. तेथे अलोट जनसमुदाय दुपारी चार वाजेपासून डॉक्टरसाहेबांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिला होता. जमलेल्या मंडळीस आपसात एकोपा राखण्यास व पुढील निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून आणण्यास सांगून डॉक्टरसाहेब आपल्या बरोबरील मंडळीसह साताऱ्यास आपल्या निवासस्थानी गेले. असा उल्लेख आहे.
त्याचप्रमाणे, बाबासाहेबांच्या अपघाताची बातमी “टाइम्स” ने दिली होती ती अशी –
Dr. Ambedkar in Motor Accident, serious injuries.
Dr. B. R. Ambedkar, leader of the Independent Labour Party, met with a serious motor accident while traveling from Kolhapur to Karad in Satara District on Wednesday.
According to information received in Bombay Dr. Ambedkar was thrown out of the car, while the driver was negotiating a bridge, and received serious injuries on his head. He was taken to hospital, where after two hours stay he insisted on going to Karad Municipal Office to keep up the engagement.
The Karad Municipality presented him with an address of welcome and he replied to it. Thereafter he again went to the hospital and proceeded to Medha, a village in the same District. He is due in Poona on Thursday morning."
(The Times of India, Thursday, 4-1-40)
तसेच आणखी एक असा उल्लेख आहे, की “मानपत्र समारंभ संपताच, बाबासाहेब अंगात ताप असताना, मोटारने पुण्यास येण्यास निघाले. त्यांनी कोणाच्या विरोधाला मानले नाही.” असे वरील दोन्ही संदर्भ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड – ८, प्रकरण – पहिले, लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे.
त्यामुळे या सनातनी मंडळी आणि या बंधुता परिषदेच्या संयोजकांना आमची विचारणा आहे, की बाबासाहेब संघ शाखेत आले होते असा अजब जावई शोध तुम्ही कोठून लावलात. त्यांनी आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
केसरी या डॉ. बाबासाहेबांच्या विरोधी वृत्तपत्राची विश्वासार्हता किती?
मुळातच केसरी हे सनातनी आणि ब्राह्मण्यवादी विचारसरणीचे प्रतिनिधित्त्व करणारे वृत्तपत्र होते. त्यामुळे केसरी या वृत्तपत्रावर आमचा कदापीही विश्वास असणार नाही. त्यामुळे या बंधुता परिषदेच्या संयोजकांनी कोणतेही थातुर मातुर संदर्भ दिले, तरी आम्हाला केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी आणि चरित्रकार लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे यांचे चरित्र खंड आणि महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकृत असे लेखन आणि भाषणाचे चरित्र खंड, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रातील संदर्भ मान्य आहेत.
ज्या महात्मा फुलेंनी टिळकांचा जामिन केला त्यांच्या निधनाची बातमी टिळकांनी केसरीत लावली नाही. कृतघ्नतेचा हा कळस होता. टिळक गेले तोपर्यंत बाबासाहेबांचा मूकनायक सुरू झाला होता. टिळकांनी महात्मा फुलेंच्या निधनाची बातमी लावली नव्हती ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात होती. बाबासाहेबांनी एक चांगला पत्रकार म्हणून टिळक निधनाची बातमी लावली. पण तिसऱ्या पानावर निधनवार्तामध्ये सर्वात खाली.
” ता. ३१/७/२० रोजी रोजी मध्यरात्री पुण्याचे रा. बाळ गंगाधर टिळक यांस येथील सरदारगृहांत देवाज्ञा झाली.”
(संदर्भ – मूकनायक, दिनांक – ऑगस्ट १४, १९२० – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन.)
यावर सनातनी मंडळींनी बाबासाहेबांच्या विरोधात रान पेटवले, मुकानायकच्या अंकांची होळी केली आणि या सनातनी मंडळींनी जेव्हा डॉ. बाबासाहेबांना समक्ष भेटून जाब विचारला, तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिले, की मी ही बातमी दिली हाच माझा मोठेपणा समजा, जेव्हा माझे गुरू महात्मा फुले यांचे निधन झाले, तेव्हा तुमच्या केसरीकारांनी त्याची साधी बातमी सुद्धा लावली नव्हती…!
केसरी या वृत्तपत्रातून आपल्यावर वारंवार होणाऱ्या टीकेचा खरपूस समाचार बाबासाहेबांनी 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'समता','जनता', 'प्रबुद्ध भारत' या आपल्या वृत्तपत्रांमधून घेतलेला आहे. डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी या सनातनी मंडळींचे आणि केसरीकारांचे दात घशात घालण्याचे काम केलेले आहे.
ज्या केसरीने महात्मा फुलेंच्या निधनाची एक ओळ देखील छापली नाही, ज्या केसरीने हा अस्पृश्यांचा पेपर आहे म्हणून बाबासाहेबांच्या मूकनायकची जाहिरात पैसे देऊन सुध्दा स्वीकारण्यास नकार दिला होता, ज्या केसरीने वारंवार डॉ. बाबासाहेबांवर गरळ ओकली होती, त्या केसरीने बाबासाहेबांच्या कराड दौऱ्याच्या आणि कधीही संघ शाखेत न गेलेल्या प्रसंगासाठी ५ ओळींची बातमी छापणे ही अतिशय हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्टच म्हणावी लागेल. तसेच या बंधुता परिषदेच्या संयोजकांनी ती बातमी घेऊन त्याचा खोटा आणि खोडसाळपणे प्रचार करणे म्हणजे स्वतःचेच दात घशात घालून घेण्यासारखे आहे.
टिळकांच्या मुलाने आत्महत्या का केली ?
मुळातच बाळ गंगाधर टिळक हे ब्राह्मणी छावणीचे प्रतिनिधित्व करीत होते. परंतु टिळकांचा मुलगा श्रीधरपंत टिळक व रामभाऊ टिळक हे बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. श्रीधरपंत टिळक हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या " समाज - समता - संघाचे" कार्यकर्ते होते. त्यांनी ऑक्टोबर १९२७ मध्ये पुण्यात डॉक्टर बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांच्या परिषदेत उपस्थितांना संबोधित केलं होतं. ते अनेकदा मुंबईत बाबासाहेबांना भेटायला जात असत आणि स्वतःच्या समूहातील पूर्वग्रह धुडकावून लावत. आंबेडकरांविषयी व अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांविषयी त्यांची भूमिका अगत्यशील होती. पुण्यातील परिषदेनंतर श्रीधरपंतांनी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आपल्या घरी म्हणजे गायकवाड वाड्यात चहापानाचं आयोजन केलं. त्यांनी अस्पृश्य मुलांच्या एका गानजथ्यालाही आपल्या घरी जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. त्यांच्या या कृतीवर केसरी - मराठा ट्रस्टच्या ब्राह्मण विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली. तरी श्रीधरपंतांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. सनातनी मंडळींची तमा न बाळगता श्रीधरपंतांनी त्यांच्या घराबाहेर ' चातुर्वर्ण्य विध्वंसक समितीचा' फलक लावून टाकला. अशी कोणतीही समिती अस्तित्वात नव्हती पण या कृतीतून श्रीधरपंत त्यांचा निग्रह व निष्ठा जाहीर करत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांचा व स्थानिक ब्राह्मण समुदायाचा रोष सहन करावा लागला.
श्रीधरपंतांवर नमतं घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला, अनेक प्रकारे त्यांची मानखंडना केली गेली, आणि त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ” केसरी ” वृत्तपत्राच्या अंकांमधून त्यांची नालस्तीही करण्यात आली. उदारमतवादी श्रीधरपंत व त्यांचा तितकाच सुधारकी वृत्तीचा भाऊ रामभाऊ टिळक यांचं केसरी – मराठा ट्रस्टच्या विश्वस्तांशी असणारं भांडण अधिक गंभीर पातळीवर गेलं आणि यासंदर्भात न्यायालयात कायदेशीर खटले दाखल झाले; हे खटले सात वर्ष सुरू राहिले. अखेरीस सनातनी ब्राह्मण समुदायाकडून व रूढीवादी केसरी – मराठा ट्रस्ट कडून येणारा दबाव असह्य झाला. श्रीधरपंतांनी या मंडळींचा उल्लेख ” एक डांबीस टोळी” असा केला होता.
या असह्य ताणाखाली येऊन श्रीधरपंतांनी २५ मे, १९२८ रोजी मुंबई – पुणे रेल्वे गाडी समोर उडी मारून तरुणपणीच आत्महत्या केली. त्यांनी अखेरचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलं होतं. ( संदर्भ – “आंबेडकर जीवन आणि वारसा”, लेखक – शशी थरूर, मधुश्री पब्लिकेशन)
त्यावेळेला सुमारे १५ लाख रुपये खर्च करून बांधलेला केसरीवाडा, केळकर आदि मंडळींनी श्रीधरपंतांना अस्पृश्य आणि डॉ आंबेडकरांची साथसंगत करतो म्हणून मालमत्तेतूनही बेदखल केले होते. त्यांच्यावर खटले भरले, त्यांची वारंवार केसरी मधून नालस्ती केली, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले त्या केसरीच्या सनातनी आणि बाजारबुणग्या कर्मठ वृत्तपत्रावर आम्ही का म्हणून विश्वास ठेवावा; तेव्हा तमाम आंबेडकरवाद्यांची त्या बंधुता परिषदेच्या संयोजकांना आणि संघीय विचारसरणीच्या लोकांना विचारणा आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असलेल्या टिळकांच्या मुलाने श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली याचे उत्तर ते देणार आहेत का?
बंधुता परिषदेचे संयोजक माफी मागणार का…?
डॉ. बाबासाहेबांचा कराड दौरा आणि त्यांचा कराड म्यूनिसीपालीटीच्या माध्यमातून मानपत्र देऊन करण्यात आलेला सन्मान तद्नंतर त्यांनी पूर्वाश्रमीच्या महारवाड्यास दिलेली भेट आणि या दोन्ही ठिकाणी झालेली भाषणे आणि अस्सल पुरावे उपलब्ध असताना, डॉ. बाबासाहेबांची संघ शाखेस भेट दिली म्हणून इतिहासाचा विपर्यास आणि मोडतोड करून, खोटी माहिती पसरविणारे आणि डॉ. बाबासाहेबांचा ओढून ताणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे लोककल्याण मंडळ ट्रस्ट
आणि या बंधुता परिषदेच्या संयोजकांना आमचे सांगणे आहे, की जर ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते, काही बाबतीत आपले मतभेद असले, तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो’ असे विधान केले असेल, तर मग बाबासाहेबांचा सामाजिक जीवनात प्रारंभ झाला, तेव्हा बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘ मूकनायक ‘, ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’ मध्ये छापल्या जात. संघाच्या शाखेस बाबासाहेबांनी जर खर्याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही.
तसेच डॉ. बाबासाहेब संसदेत आर.एस.एस. बद्दल बोलताना, दि. १४ मे १९५१ रोजी काय म्हणाले ते सर्व रेकॉर्ड संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. डॉ. बाबासाहेब बोलतात, –
“May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations.”
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.”
(संदर्भ – संसदेतील चर्चेचे खंड – ११ वा, भाग – २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड – १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०)
हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले डॉ. बाबासाहेबांचे उद्गार आहेत.
आता आम्ही या बंधुता परिषदेच्या संयोजकांना हे विचारतो, की बाबासाहेबांनी हे आर.एस.एस.चे कौतुक केले आहे का?
जर हेडगेवार आणि बाबासाहेबांचे हिंदुत्व एक होते, त्यांचे विचार समान होते असा दावा तुम्ही करत असाल, तर मग बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म का स्वीकारला? तुम्हाला जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एवढेच प्रिय असतील, तर सर्व ब्रह्मवृंद आणि हे बंधुता परिषदेचे सर्व संयोजक आणि तिथले स्वयंघोषित विचारवंत हे बौद्ध धम्माचा स्वीकार करणार का? बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करणार का? या सर्व प्रकरणावर ओढून ताणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आर.एस.एस.सोबत संबंध जोडण्यात काय हशील आहे?
डॉ. बाबासाहेबांच्या समग्र स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वांना हे बंधुता परिषदेचे संयोजक आणि आर.एस.एस. काळीमा फासत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाचा विपर्यास करून, मोडतोड करून खोटा इतिहास पसरवत असल्याबद्दल हे बंधुता परिषदेचे संयोजक आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी मागणार का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दैदिप्यमान वैचारिक वारसा असणारे आम्ही आंबेडकरवादी या सनातनी डांबीस टोळीचे सर्व खोटे मनसुबे आणि कुटील डाव हाणून पाडू एवढंच या निमित्ताने सांगतो.
प्रज्वल मोरे,
सातारा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत