पश्चिम रेल्वेवर १० दिवस २५० लोकल रद्द.

तब्बल १५ वर्षे रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम पश्चिम रेल्वेने सुरू केले आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून यामध्ये रोज सरासरी २५० लोकल आणि ६१ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.
सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून २९ दिवस रूळजोडणीचे काम चालू राहणार आहे. २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत रूळजोडणीचे मुख्य काम करण्यात येणार आहे. या शेवटच्या दहा दिवसांत रोज सरासरी सुमारे २५० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तितक्याच लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल, यादृष्टीने रेल्वे अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणे गरजेचे आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणे अव्यवहार्य असल्याने ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत