भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८६

संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार
कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते.
संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत. त्यांचे म्हणणे असे होते की, अशा योजनेमुळे असे घडेल की, काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, “ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे.”
ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता.
तथागतांचे म्हणणे होते की, हा धर्म स्थापून, उपकारक अशा मुक्तीजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता:
सद्धम्माचा जलाशय
तथागतांची इच्छा होती की, पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील आणि जर कोणी ह्या सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर, त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे.
तथागत म्हणाले, “लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, ‘जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये. ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे,’ तर ते योग्य ठरणार नाही.”
“आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती.
व्रत-नियमांचे टीकाकार
पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे? असे प्रश्न नेहमी विचारले जात असत.
जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषंधानी देह दुर्बल करण्याचा फायदा काय? असे मतप्रदर्शन केले जात असे.
तसेच गृहस्थ उपासकांना संसारात राहून, सर्व सुखे उपभोगूनही पंचशीलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्खूंना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता काय?
तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजिले होते. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्त्वाची वृद्धी होते व अधःपातापासून रक्षण होते. जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते.
व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार ह्याचे नियमन वा कुविचारांचे निर्मूलन. जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. मात्र फक्त पंचशील ग्रहण केल्याने हे साध्य होत नाही.
व्रतग्रहणाने नैतिक अधःपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही.
व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील ग्रहणाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.८.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड सहावा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत