थोडी जरी लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा- राऊत

आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात, असा आरोप संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू असून सोमवारी एका दिवसात २४ रुग्णांचा बळी गेल्यानंतर आज आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार नवजात बालकांचा समावेश आहे. यामुळे गेल्या ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. असे असून देखील रुग्णालय प्रशासन धिम्म असून औषधांच्या कमतरतेमुळे हे झाल्याचे विद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी नाकारले आहे. दरम्यान, यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर घणाघात केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नांदेडमध्ये घडलेली घटना राज्यातील पहिली घटना नाही. या आधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयात देखील असा प्रकार घडला होता.
राज्यात औषधांचा तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचा व्यवहार, परदेश दौरा, माणसे फोडण्यात यातच रस आहे. थोडी जरी माणुसकी व लाज शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात, असा आरोपही त्यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत