दिन विशेषदेशदेश-विदेशमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

महापरिनिर्वाण दिनी “भीमलंगर” हवे !

परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी , दादर येथे लाखोंच्या संख्येने जनता येते. या जनतेचे व्यवस्थापन करणे हे एक कौशल्याचे काम असते. आलेल्या जनतेने अभिवादनाची रांग कशी लावावी , अभिवादन कसे करावे , याचे नियोजन करावे लागते. या जनतेला राहण्यासाठी तंबू उभारावे लागतात. तिला ग्रंथ विकत घ्यायचे असल्यास त्याची व्यवस्था करावी लागते. तिच्या जेवणाखाण्याची सोय करावी लागते. अगदी तिच्या मलमूत्र विसर्जनाची देखील सोय करावी लागते.
अशा प्रकारच्या सर्व सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार व महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने कार्यरत असतात. विशेष म्हणजे या जनतेला भोजन देण्यासाठी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने हजारो कार्यकर्ते आनंदाने पुढाकार घेतात. काही जण चांगल्या ठिकाणी नोकऱ्या करतात. तेथील साधनसामग्री देखील यांसाठी वापरली जाते. हे सगळे खरे असले तरी आज या भोजन व्यवस्थेचे शासन स्तरावर समन्वयन होणे गरजेचे आहे. असे समन्वयन नसल्याने पुरेसे भोजन असूनही जनतेला रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते व अन्नाची नासधूस देखील होते. हे दोन्ही प्रकार टाळायला हवेत.
महापरिनिर्वाण दिनी भोजनदान करणारे कार्यकर्ते हे आपल्या सोईनुसार भोजनदानाचे वेळापत्रक ठरवतात. ते ठरवताना ते आपल्या आजूबाजूला भोजनदान देणाऱ्या ज्या संघटना वा कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चाविनिमय करुन भोजनदानाच्या वेळापत्रकाचे समन्वयन करणे गरजेचे वाटते. आज अगदी शेजारी शेजारी असलेल्या वेगवेगळ्या संघटनांच्या समोर भोजन इच्छुक जनतेच्या दोन दोन रांगा दिसून येतात. मग एका संघटनेने दिलेला डाळ- भात कोणाला आवडला नाही तर तो फेकून देतो व पुलाव देणाऱ्या रांगेत घुसतो ! हजारोंची गर्दी व सगळेच भूकेलेले ! ती गर्दी व अव्यवस्था पाहून हौसेने समाजसेवा करायला आलेल्यांचा हिरमोड होतो. यथावकाश हा राग उपाशीतापाशी जनतेवर आरडाओरडा करून काढला जातो. या प्रकारात अन्नाची नासधूस होतेच शिवाय मनुष्यबळ व वेळेचाही अपव्यय होतो.
अन्न ही माणसाची प्राथमिक गरज आहे. हे अन्न सेवन करताना आपण स्वच्छता – टापटीप पाळतो. अगदी पंगतीत भोजन करायला बसलो तरी आपण काही पथ्ये आवर्जून पाळतो. भोजन वाढणाऱ्याने प्रेमाने व आपुलकीने वाढावे , अशी आपली अपेक्षा असते. त्याचप्रमाणे पंगतीत बसलेल्यांनी पोटभर जेवावे परंतु अन्न वाया घालवू नये , अशी वाढणाऱ्यांची अपेक्षा असते. या दोन्ही अपेक्षांचा सुरेख मेळ जमला की भोजनदान सार्थकी लागते.
महापरिनिर्वाण दिनी होणारे भोजनदान या अपेक्षा पूर्ण करते का ? भोजनदान करणारे व भोजनदान घेणारे या दोघांनीही या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर द्यावे. उत्तर स्पष्ट आहे. या दुःखद प्रसंगी भोजनदान करणारे व घेणारे हे दोघेही आपापल्या मर्यादा सोडून वागत असतात. ‘भोजन दिले , आता आमची जबाबदारी संपली’ अशी देणाऱ्यांची भावना असते. भोजनदानाचा विनियोग चांगला व्हायला हवा , यांकडे त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे हाती भोजन असलेला “माणूस” —- आंबेडकरी माणूस— कशा पद्धतीने हे भोजन सेवन करील , हा प्रश्न भोजनदान करणाऱ्यांना पडत नाही. समोरचा “आंबेडकरी” माणूस भिकाऱ्यासारखा हाती पत्रावळी घेऊन अन्न सेवन करीत आहे , हे चित्र आम्हाला चांगले वाटते का ? समोरचा “आंबेडकरी” माणूस धूळ भरलेल्या मैदानात वा अस्वच्छ रस्त्यावर फतकल मारून बसला आहे व वचावचा जेवत आहे , हे दृश्य आम्हाला अभिमानास्पद आहे काय ? समोरचा “आंबेडकरी” माणूस अज्ञानी असेल कदाचित , परंतु भोजनदान देणारे तर चांगले शिकले- सवरलेले अधिकारी , इंजीनीयर असे उच्चशिक्षित कार्यकर्ते असतात ना ! मग भोजनदानातील हा साव़ळागोंधळ निपटवणे हे आमच्या बुद्धीच्या बाहेरचे प्रकरण आहे काय ? आमचे वकील अगदी सुप्रीम कोर्टात अकाट्य युक्तीवाद करून हरलेली केस जिंकू शकतात. आमचे अधिकारी महानगरांचे – राज्याचे – देशाचे कोणतेही प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतात. आमचे इंजीनीयर कोणत्याही तांत्रिक समस्येवर मात करू शकतात. आमचे निडर कार्यकर्ते कोणाच्याही केबिनमध्ये घुसून रोखठोक भाषेत आपले म्हणणे मांडू शकतात. मग हे सगळे जण महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या जनतेला सन्मानाने भोजनदान का करू शकत नाहीत ?
‘आम्हाला चैत्यभूमीवर येणाऱ्या जनतेला भोजन द्यायचे आहे’ ही आपल्या अधिकारी वर्गाची भावना प्रामाणिक असते. परंतु एखाद्या लग्नातील वा जयंती उत्सव कार्यक्रमातील भोजनाची पंगत व चैत्यभूमीवर आलेल्या लाखोंच्या समुदायाला भोजनदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. लग्न वा जयंती कार्यक्रमात सहसा परिचित लोक असतात. तिथे काही कमी- जास्त झाले तर समस्या सोडविण्याचे मार्ग वेगळे असतात. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर “हे असे” व्यवस्थापन चालत नाही. तिथे आलेली जनता एक तर दु:खद मानसिक अवस्थेत असते, अभावग्रस्त असते. तिला सन्मानाने व शांतपणे भोजन खाऊ घालणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रचलित भोजनदान प्रक्रियेत आमुलाग्र बदल करायला हवेत. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरात चोवीस तास चालणारे “भीम लंगर” हे या समस्येचे एक उत्तर होऊ शकते.
लंगर हा शब्द शीख धर्माच्या परंपरेतून आला आहे. शीख धर्माच्या धार्मिक उपासना स्थळास गुरुद्वार म्हणतात. या गुरुद्वारात आलेल्या उपासक – उपासिकांना लंगर व्यवस्थेतून भोजन दिले जाते. या भोजनाचा खर्च आलेल्या दानातून केला जातो. हात-पाय धुणे , स्वच्छतागृहे , स्वच्छ किचन , जेवणासाठी प्रशस्त हॅाल अशा सोईसुविधा प्रत्येक गुरुद्वारात असतात. आलेल्या सर्वांना सन्मानाने बसवून तिथे भोजनदान दिले जाते. इच्छुक मंडळी ‘गुरुचा प्रसाद’ म्हणून मिळालेले भोजन शांतपणे सेवन करतात. पंगतीत बसलेल्यांना पोटभर जेवण मिळावे, यांसाठी वाढपी आग्रही असतात. जे हवे ते सर्व देतात. परंतु ‘गुरुचा प्रसाद’ म्हणून कोणी अन्न वाया घालवीत नाहीत. चैत्यभूमीवर भोजनदान करणाऱ्या सर्व संघटनांनी आपल्या नजीकच्या गुरुद्वाराला भेट देऊन हे ‘व्यवस्थापन’ एकदा जवळून अनुभवावे , अशी आमची विनंती आहे. तेथील सेवाभाव , मान-सन्मान पाहून आपण चकीत होतो.
शीख धर्मातील हे उदाहरण पाहता , महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर असे चोवीस तास चालणारे “भीम लंगर” आपल्या भोजनदान करणाऱ्या संघटना का चालवू शकत नाहीत ? या संघटनांकडे निधी आहे , सामाजिक जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे , त्यांना वर्षानुवर्षे भोजनदान करण्याचा अनुभव देखील आहे. या सर्वांचे नीट समन्वयन केल्यास महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या जनतेला अगदी चांगल्या पद्धतीने भोजनदान करता येईल. “भीम लंगर” चोवीस तास चालू राहील. त्यामुळे ज्या कोणाला अन्नाची गरज वाटते ते कधीही येऊन सन्मानाने नीट बसून शांतपणे भोजन करतील, पोटभर जेवणाची शाश्वती असल्यामुळे कोणी अन्नाची नासधूस करणार नाहीत. जे ताटात येईल ते पोटभर खातील. महापरिनिर्वाण दिनाच्या भोजनदानाला शिस्त येईल. असे शिस्तबद्ध भोजनदान ही आपल्या समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट ठरणार नाही काय ?
मुळात परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा एक दु:खद प्रसंग आहे. शक्यतो या दिवशी बौद्ध परंपरेतील उपोसथ पाळावे. आपल्या घरी कोणाचे मयत झाल्यास आपण चूल बंद ठेवतो. शोक म्हणून काही ठिकाणी तर तीन दिवस चूल पेटवत नाहीत. अशा वेळेस शेजारपाजारचे व आप्तेष्ट जण पोटाला आसरा म्हणून काही तरी सोय करतात. यथावकाश शोकावेग कमी झाल्यावर ‘अनित्यता’ तत्त्वाप्रमाणे हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होतात.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आलेल्या सर्व जनतेने उपोसथ पाळावे , हे उत्तम होय. तथापि, हा आदर्शवाद झाला. बौद्ध धम्माचा वाढणारा प्रभाव विचारात घेता ही वेळ येत्या काळात येईल, हे खरे आहे. परंतु जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत आपणांस तिथे येणाऱ्या जनतेला सन्मानपूर्वक भोजनदान द्यावे लागणार आहे. “भीम लंगर” हा उपक्रम त्यासाठीच आहे.
यासाठी शासन काय करू शकते ? शासन अनेक गोष्टी करू शकते. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्क मैदानाचा एक विशिष्ट भाग केवळ २४ तास चालणाऱ्या “भीम लंगर” साठी राखून ठेवून तिथे भोजनासाठी मोठे मोठे तंबू उभारू शकते. ज्या कोणाला भोजनदान द्यायचे आहे त्यांनी याच तंबूंतून भोजनदान द्यावे , यांसाठी शासन काही सूचना प्रसारित करू शकते. भोजनदान करणाऱ्यांना अशा तंबूंतून आपले बॅनर्स – फोटो लावण्याची अनुमती देऊ शकते. जे ऐनवेळेस भोजनदान आणतात त्यांचे भोजन गोळा करण्यासाठी व वितरीत करण्यासाठी काही स्वयंसेवक नेमू शकते. बाजूलाच कॅटरिंग कॅालेज आहे , किर्ती कॅालेज आहे. वरळी येथे अनेक शासकीय इमारती आहेत, मैदाने आहेत. शासन या सर्वांचा यथायोग्य विनियोग करू शकते. अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेची रांग थेट वरळीपर्यंत गेलेली असते. मुख्य मार्गावर बॅरिकेड्स टाकून तिथेच ही रांग फिरवतां येऊ शकते. शासनाने ठरवले तर अशा अनेक गोष्टी सहज होऊ शकतात. कुंभ मेळा वा आषाढी – कार्तिकी वारकरी वा तत्सम गर्दीचे नियोजन करणाऱ्या शासनाला महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या जनतेचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. विशेष म्हणजे चैत्यभूमीवर सेवाभावी उपक्रम राबविणारे अनेक जण वरिष्ठ शासकीय पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मनावर घेतले तर हे सहज शक्य होईल. मुळात या जनतेच्या भोजनाची व्यवस्था शासनाने स्वत:च्या अंगावर घेतली तर हे सर्व व्यवस्थापन करण्यास काहीही अडचण उद्भवणार नाही.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या जनतेचा लोंढा विचारात घेता आज ना उद्या शासनाला या सर्व प्रक्रियेत हस्तक्षेप करावा लागेल , हे स्पष्ट आहे. ती वेळ येईल तेव्हा येवो, दरम्यानच्या काळात एक आंबेडकरवादी म्हणून “भीम लंगर” अस्तित्वात आणण्यासाठी आपण काय करू शकतो ? यांवर सर्वांनी चिंतन-मनन व विचारविनिमय केल्यास पुढील वर्षांपासूनच आपण या दृष्टीने कार्यवाही करू शकतो. तसे झाल्यास महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य अधिक चांगल्या पद्धतीने राखले जाईल !
—- शांत चैत्यभूमी अभियान, मुंबई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!