महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मेंदू कुणाचा? हात कुणाचे?

प्रा. डॉ. सतीश मस्के

माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपले स्वतःचे अस्तित्व समाजाशिवाय तो निर्माण करू शकत नाही. आपले विचार समाजाला कळल्याशिवाय त्याचे स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाही. स्वतःचे अस्तित्व आणि विचार निर्माण करण्यासाठी त्याने निरीक्षण आणि वाचन करणेही महत्त्वाचे असते. निरीक्षण आणि वाचन केल्याशिवाय तो विचार करू शकत नाही. वाचन माणसाला संपन्न,समृद्ध,विवेकशील बनवत असतं. हे संपन्न, विवेकशील आणि समृद्ध झालेलं मनच समाजात एक क्रांती म्हणजेच बदल घडवून आणू शकतं. मनाने समाज व्यवस्थेचा अभ्यास करून समाज व्यवस्था ओळखायला हवी तरच मानवी मन आणि समाज समृद्ध होईल. आज-काल जिकडे तिकडे लहान असो किंवा मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, शहरातला असो किंवा खेड्यातला असो, विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो किंवा कुठल्याही जाती धर्मातील असो त्यांची मने मात्र अपरिपक्व आणि असंवेदनशील होताना दिसत आहेत. त्यामुळेच देशात आज अराजकता, भ्रष्टाचार, अनिती, विषमता फोफावताना दिसत आहे. या साऱ्या गोष्टींची उकल व्हावी म्हणून प्रा. डॉ.आर.जी. इंगोले यांचा ‘मेंदू कुणाचा? हात कुणाचे?’हा वैचारिक ग्रंथ महत्त्वाचा वाटतो.
प्रा. डॉ. आर जे. इंगोले यांचा नुकताच ‘ मेंदू कुणाचा? हात कुणाचे?’ हा पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद मे प्रकाशित केलेला चारशे आठ पानांचा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण सत्त्याहत्तर विविध विषयावरील लेख आहेत. त्यांचे अनेक लेख मुंबईच्या दैनिक वृत्तरत्न सम्राट मधूनही प्रकाशित झालेले आहेत. स्वतः लेखक हे समाज चिंतक, विचारवंत व अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत.हे लेख निश्चितच माणसाचे मस्तक संपन्न करणारे आहेत. माणसाला खरेपणाची म्हणजे सत्याची जाणीव करून देणारे आहेत. जीवन जगत असताना माणूस अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी घेऊन जगत असतो. अशा या खोट्या आणि काल्पनिक गोष्टी घेऊन जगणारा माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी विचार किती महत्त्वाचे असतात हेच या ग्रंथातून प्रा. डॉ.आर.जे. इंगोले यांनी दाखवून दिले आहे.
आजच्या हल्लीच्या म्हणजे आधुनिक काळातील सामाजिक,धार्मिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, बौद्धिक व इतरही क्षेत्रातील परिस्थिती फार म्हणजे फारच गोंधळाची असल्याची दिसून येते. जाणवतेही. हल्लीची परिस्थिती ही इथल्या प्रत्येक माणसाला, तरुणाला, सुशिक्षिताला, सामान्य माणसाला सत्यापासून कोसो दूर लोटणारी आहे, भ्रम निर्माण करणारी आहे असेच चित्र दिसते. भयग्रस्त अशी परिस्थिती आहे.वर्तमानकाळ हा हल्ली अस्वस्थ दिसत आहे. सामान्य जनता त्रस्त आहे. शिकलेले तरुणही नौकरी विना बेरोजगार आहेत. महागाई गगनाला जाऊन भिडली आहे. तरिही समाजात,देशात अंधश्रद्धा,रूढी परंपरा, जात,धर्म, यांचे पीक भरघोस प्रमाणावर वाढत आहे. मुद्दामहून वाढविले जात आहे सरकारही त्याला कुंभमेळा,काळी जादु,पांढरी जादु अशा प्रकरणावरून खतपाणी घालताना दिसत आहे. या अशा अनेक विविध साऱ्या प्रश्नांची चर्चा ‘मेंदू कुणाचा? हात कुणाचे? या ग्रंथात प्रा. डॉ .आर.जे.इंगोले यांनी केली आहे. ही चर्चा किंवा लेखन वाचकाला किंवा सर्वसामान्य माणसाला दिशादर्शक, मार्गदर्शक निश्चितच ठरणारे आहे. भोंदूगिरी, अंधविश्वास या जाळ्यात अडकलेल्यांना निश्चितच त्यातून बाहेर काढण्यास मदत करणारे हे लेखन आहे.
आजच्या म्हणजे सध्याच्या वर्तमान काळातही खूप कमी लोक पुरोगामी विचाराने जगताना, वागताना किंवा आचरण करताना दिसतात. सामान्य लोक आजही सनातन विचारांच्या विळख्यात अडकली आहेत. महिलांचाही समावेश यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांचा समावेश शाळापेक्षाही मंदिराकडे अडकत चालला आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवनात अधोगती होताना दिसत आहे. जीवनाची वाटचाल अंधकारमय होताना दिसत आहे. बहुजन समाज ही काल्पनिक कर्मकांडामध्ये अडकला व मुद्दामहून अडकविला जात आहे. शिक्षणामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. समाजाचा विकास होतो. शिक्षण हे सर्व दुःखण्यावरचा उपाय आहे. फुले, शाहू व आंबेडकरांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या विचारांची कास प्रत्येकाने धरायला हवी. त्यांच्याच विचारांची गरज खऱ्या अर्थाने आज देशाला आहे. हे मात्र आम्ही विसरून चाललो आहोत. हे लेखकांनी ‘ इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले ‘ या प्रकरणात अगदी मुद्देसूदपणे मांडले आहे.
आज बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर गुलाम होताना दिसत आहे. त्यांच्याकडून संस्कृतीच्या नावाखाली सण, उत्सव साजरी करून घेतले जातात. त्यांच्याकडूनच विविध क्षेत्रात विघातक घटना घडवून आणल्या जातात. आजच्या राजकारणातही काही मूठभर लोक धर्माच्या, जातीच्या नावाखाली रूढी, परंपरा व अंधश्रद्धचे विष पेरताना दिसत आहेत. हे विष पेरण्याचे काम सबंध बहुजन समाजाच्या हातातून केले जाते.हे वाईट आहे. खरे तर एखादा नवीन विचार कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूत पहिल्यांदा येतो. त्या विचारांची अंमलबजावणी त्याच व्यक्तीने करायला हवी. तरच त्या विचाराची परिणामकारकता चांगली दिसून येते.फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची परिणामकारकता आज आपल्याला दिसून येत आहे. पण अलीकडे तसे होताना दिसत नाही. कारण एखादी योजना एका मेंदूत असते व त्याची अंमलबजावणी मात्र दुसरे करताना दिसतात. म्हणजेच आजच्या परिस्थितीत अनेक जण स्वतःच्या बुद्धीने चालण्याऐवजी दुसऱ्याच्या बुद्धीने चालताना खोट्यालाही खरे म्हणताना दिसतात. त्यांच्यामध्ये खोट्याला नकार देण्याची हिंमत होत नाही.त्यामुळे देश विकसित किंवा महासत्ता होण्याऐवजी अधोगती कडे जाताना दिसत आहे. समाज मानसिक गुलाम झाला की तो अधोगतीकडे जातो. त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसानही होते. त्यामुळे बहुजनांनी एक होणे काळाची गरज आहे. आपली ताकद मोठी आहे. आपल्याला छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, बुद्ध,फुले,शाहू व आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. तेच विचार हल्ली जातीय , धर्मांध,अंधविश्वासू, अनैतिक, कर्मकांडी,दलदलीतून आपणास बाहेर काढण्यास मदत करतील. हे सारे सर्वसामान्य बहुजन समाजातील माणसाने लक्षात घेऊनच वाटचाल करायला हवी.असे लेखक प्रा. डॉ.आर.जी. इंगोले यांना वाटते. म्हणून त्यांनी ‘मेंदू कुणाचा ? हात कोणाचे? या प्रश्नातमक लेखातून विश्लेषण केले आहे.
साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. साहित्यिकाने समाजातील प्रश्न अगदी बिनदिक्कतपणे व परखडपणे मांडले पाहिजेत. साहित्यिकांचा, पत्रकारांचा, विचारवंतांचा दबाव शासनावर असायला हवा. साहित्यिकांनी,विचारवंतांनी सत्य परिस्थिती आपल्या लेखनातून उजागर करायला हवी. तरच समाजाला मार्गदर्शन मिळत असते. पण आत्ताच्या साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांना या गोष्टीचे भान राहिले नाही. आपली जबाबदारी काय? हे ते सारे विसरलेले दिसत आहेत. लोकांना बरं वाटणारं साहित्य ते निर्माण करताना दिसतात. खरं साहित्य त्यांच्या लेखणीतून पाझरताना दिसतच नाही. आशा म्हणजे फक्त बरं लिहिणाऱ्या साहित्यिकांनाच सरकारही पुरस्कार देताना दिसत आहे. लेखकांनी, विचारवंतांनी समाजास लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य लिहायला हवे. समाजाला परिवर्तनासाठी तयार करायला लावणारे साहित्य निर्माण करायला हवे. कारण साहित्य आणि कलेचा प्रभाव समाज मनावर जास्त असतो. त्यामुळे त्यांनी हे प्रामाणिक काम करायला हवे. साहित्यिकांनी सतत जागृत राहून स्वार्थ बाजूला ठेवून आपली लेखणी चालवायला हवी असे लेखकाला वाटते म्हणून प्रा. डॉ.आर.जे. इंगोले आपल्या लेखातून सांगतात ‘ साहित्यिक आणि विचारवंतांनी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं ‘
अशाप्रकारे प्रा. डॉ. आर.जे.इंगोले समाजातील विविध क्षेत्रातील वास्तविकता विविध लेखातून बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टिकोनातून ते उलगडून दाखवताना दिसतात. पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच वाचकांची, साहित्यिक, विचारवंताची झापडं उघडल्याशिवाय राहणार नाहीत. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहोत ही जाणीव बहुजन समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे पुस्तक प्रत्येकानी वाचायला हवे. आपल्या मेंदूतून आलेल्या विचारांची अंमलबजावणी स्वतःच करायला हवी. तरच समाजाचे,देशाचे भवितव्य प्रकाशमय आहे.होईल. हे लेखकाने ग्रंथातील पानापानातील शब्दातून दाखवून दिले आहे. या ग्रंथातील भाषा सहज, ओघवती, साधी,सोपी, चिंतनशील, परिवर्तनशील,विचार करायला लावणारी आणि वाचकाच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे. त्यामुळे हा ग्रंथ संदर्भग्रंथ असून प्रत्येकाने आवर्जून वाचावा व त्या दिशेने वाटचाल करावी एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

प्रा. डॉ. सतीश मस्के
कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
मो.९४२३३९७४८४

मेंदू कुणाचा ? हात कुणाचे ?
लेखक: प्रा. डॉ. आर.जे.इंगोले
पंचफुला प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद)
पृष्ठे: ४०८, मूल्य: ४५० रु.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!