दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

चळवळीच्या इतिहासातील दडवलेले सोनेरी पान.

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.काँग्रेसचे नेते म्हणूनही भाऊसाहेब परिचित आहेत.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे ते अध्यक्ष होते.एवढेच नव्हे तर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी दोघांनी बाबासाहेबांच्या पक्षाकडून निवडणूक लढविली होती.हे मात्र खुबीने दडवले जाते.खरे पाहता ‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.त्याच डॉ.भाऊसाहेब देशमुख ह्यांनी अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह बाबासाहेबांच्या सोबतीने राबविला होता.एवढाच काय तो इतिहास सांगितलं जातो. .अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’ प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले.मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतीलही प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.त्यात हिरीरीने सहभागी झालेले मोठे प्रस्थ म्हणजे भाऊसाहेब होत.ह्या पलिकडे बाबासाहेब आणि भाऊसाहेब ह्यांचे नाते सांगितले जात नाही.आंबेडकरी इतिहासातील हे सोनेरी पान कायम दडवून ठेवले गेले.
मजूर पक्षाच्या मध्यप्रांत वन्हाडमध्ये प्रांतिक शाखा अध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख.

डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे मोठे सुधारणावादी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे.डॉ देशमुख उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले.स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.’भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.हेच डॉ देशमुख १९३६ साली बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्यप्रांत व-हाड शाखेचे अध्यक्ष होते.

स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेच्या वेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यामध्येच मध्यप्रांत वऱ्हाड मध्ये प्रांतिक शाखा स्थापन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. त्याप्रमाणे मध्यप्रांत वऱ्हाड या प्रांताची प्रांतिक शाखा स्थापन करण्यासाठी नागपूरचे मजूर पुढारी रावसाहेब आर. डब्ल्यू फुले यांनी पुढाकार घेऊन डॉ. आंबेडकरांना त्या संबंधी पत्र लिहून सम्मती घेतली. डॉ. आंबेडकरांची अनुमती मिळाल्यानंतर रा.सा. फुले यांनी श्री. एल. एन. हरदास व अमरावतीचे पुरोगामी विचाराचे डॉ. पंजाबराव देशमुख यांचेशी विचार विनिमय करून कार्यकर्त्याची एक बैठक रा. सा. फुले यांच्या घरी बोलावण्यात आली. ही बैठक ५ नोव्हेंबर १९३६ रोजी श्री. एस.जी., नाईक, एम.एल. सी., अमरावती यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षांची मध्यप्रांत वऱ्हाड प्रांतिक शाखा स्थापन करण्यात आली. “

स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्यप्रांत व-हाड शाखेची कार्यकारणी.

डॉ. पंजाबराव देशमुख (अध्यक्ष), सिताराम हाडके (कार्याध्यक्ष) , एल.एन. हरदास (मुख्य कार्यवाहक), अॅड. आर. डब्ल्यू. फुले व श्री. रेवाराम कवाडे (कार्यवाहक), विठू फकिरा रंगारी (खजिनदार) स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रांतिक कार्यालय अँड फुले यांचे निवास, वॉकर रोड, नागपूर येथे होते.

पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच प्रांतिक विधीमंडळाच्या निवडणूका फेब्रुवारी १९३७ मध्ये होणार होत्या. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाला आपल्या पक्षाचे सभासद वाढवण्यास व पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यास फार कमी कालावधी मिळाला होता. मध्यप्रांत वऱ्हाड डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन पार्लमेन्टरी बोर्डाची बैठक १८ ऑक्टोंबर १९३६ रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रांतिक शाखांना सहकार्य करण्यासंबंधीची चर्चा महत्त्वाची होती. याच सभेत स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रांतिक कमिटीबरोबर दलित फेडरेशनने निवडणुकात सर्वतोपरी मदत करावी असा निर्णय घेण्यात आला आणि निवडणूक कार्याकरिता एक सब कमिटी नेमण्यात आली. या सब कमिटीमध्ये सर्वश्री पतीत पावनदास, संभुजी खंडारे, बंसीलाल रामटेके, रेवाराम कवाडे व विठ्ठल साळवे हे होते. यावरून हे स्पष्ट होते की, बाबासाहेबानी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूरपक्षाने कार्याचा प्रारंभ प्रांतिक दलित फेडरेशनच्या माध्यमातूनच झाला. अकोल्याचे संभुजी खंडारे, अमरावतीचे श्री. एस. जी. नाईक व डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सारखे पुरोगामी स्पृश्य स्वतंत्र मजूर पक्षाचे नेतृत्व करू लागल्याने या पक्षाचा पाया मध्यप्रांत वऱ्हाडमध्ये विस्तृत होऊ लागला.

ब्रिटिश संसदेने १९३५ साली भारतासाठी पारित केलेल्या कायद्याने भारतीयांना विधीमंडळावर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले. त्यानुसार १९३७ साली निवडणूका होणार असल्याने, त्यासाठी तत्कालीन सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत होते. या निवडणुकीत भाग घेण्यासाठी अस्पृश्यांच्या राजकीय पक्षाची आवश्यकता होती. तसेच काँग्रेस पक्षाने अनेकदा अधिवेशनांमधून समाजसुधारणा घडवून आणण्याविषयी अनेक ठराव केले होते; परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती.तसेच बॅरिस्टर गांधीच्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांना १९३२ साली विरोध केला होता. त्यामुळे, अस्पृश्यांसाठी वेगळा पक्ष स्थापन करणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक वाटत होते. यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ १५ ऑगस्ट १९३६ साली स्थापन केला.स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.१७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची मानली होती. या वेळी मजूर पक्षाने १५ उमेदवार उभे केले होते. व दोन उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: मुंबईमधून उभे होते. पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार व पाठिंब्याचे दोन असे १५ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पक्षाला मिळालेले हे यश घवघवीत होते.स्वतंत्र मजूर पक्षाने १९३७ ते १९३९ या दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. या पक्षाच्या प्रतिनिधींनी विधिमंडळात अनेक विधेयके मांडली. अनेक विधेयकांवर प्रभावीपणे मते मांडली. सर्वांनी विधीमंडळ कामकाजात भाग घेतला. त्यामुळे सरकार पक्षाला खरी भिती स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधींची वाटत होती.ह्या निवडणूक काळात ज्याला व-हाड किंवा सीपी आणि बेरार चा एक भाग म्हणून पाहिले जात होते, त्याठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब देशमुख काम पाहत होते.डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्यप्रांत वऱ्हाड शाखेचे अध्यक्ष होते
प्रांतिक विधी मंडळाच्या निवडणुका १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार १९३७ साली घेण्यात आल्या.स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने विदर्भात राखीव असलेल्या जागा बरोबरच खुल्या जागावर उमेदवार उभे करण्यात आले होते. पश्चिम विदर्भातील पुरोगामी विचारांचे डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्यप्रांत वऱ्हाड शाखेचे अध्यक्ष होते.त्याकाळी मध्यप्रांत वऱ्हाड मधील स्वतंत्र मजूर पक्षाची धुरा डॉ पंजाबराव देशमुख हे सांभाळत होते. पश्चिम विदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजूर पक्ष निवडणुकीत उतरला होता. डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतः तसेच त्यांच्या पत्नी सौ. विमलाबाई देशमुख व विठ्ठल बंडूजी चौबळ वकील खुल्या जागेवरून निवडणूक लढवीत होते.उमेदवारांची नावे १४ जानेवारी १९३७ रोजी पत्रक काढून प्रसिद्ध करण्यात आली. सर्वसाधारण व अस्पृश्यांसाठी राखीव असलेल्या जागावर उभे करावयाच्या उमेदवाराची नावे पुढीलप्रमाणे होती. १. ‘संभूजी अनसुजी खंडारे- (अकोला-बाळापूर खेडे विभाग), २. यादवराव पवार चिखलीकर – (चिखली मेहकर),३. संपत यादवराव नाईक (एलिचपूर-दर्यापूर-मेळघाट), ४. डी.के. भगत- (यवतमाळ-दारव्हा-खेडेविभाग),५.देवाजी भिवाजी खोब्रागडे – (चांदा ब्रम्हपुरी), ६. दौलत भिमसेन बारसे – (छिंदवाडा सौंसर), ७. केशव नारायणदेव उर्फ पतीत पावनदास- (हिंगणघाट वर्धा), ८. राघव गंभीर घोडीचोर – (भंडारा-साकोली), ९.रावसाहेब फुले (वकील)- (नागपूर मजूर संघाच्या वतीने ), १०. डॉ. पंजाबराव देशमुख -(अमरावती तहसिल), ११. विठ्ठल बंडूजी चौबाळ वकील – (व-हाड पूर्व विभाग), १२. सौ. विमला पंजाबराव देशमुख – (अकोला अमरावती स्त्री विभाग), १३. रावसाहेब लाला जमनारायण- (रामटेक तहसिल विभाग), १४. सिताराम पाटील- (नागपूर उमरेड), १५. एल.एन. हरदास – (नागपूर-कामठी)’

स्वतंत्र मजुर पक्षाच्या वतीने मध्यप्रांत वऱ्हाडमध्ये लढविलेल्या १५ जागापैकी फक्त पाच उमेदवार निवडून आले.त्यामध्ये एल. एन. हरदास (नागपूर-कामठी), राघोबाजी घोडीचोर (भंडारा-साकोली), देवाजी भिवाजी खोब्रागडे (चांदा-ब्रम्हपुरी), डी. के. भगत (यवतमाळ-दारव्हा) आणि सिताराम पाटील (नागपूर उमरेड) ह्यांचा समावेश होता. अस्पृश्यांसाठी राखीव असलेल्या जागावरून स्वतंत्ररीत्या निवडून आलेले दशरथ लक्ष्मण पाटील (हिंगणघाट-वर्धा) व गणपतराव जांभूळकर (छिंदवाडा-साँसर) यांनी पुढे स्वतंत्र मजूर पक्षात प्रवेश केला.पश्चिम विदर्भात अस्पृश्यासाठी राखीव असलेल्या मतदार संघामध्ये डी. के. भगत (यवतमाळ-दारव्हा) हे एकमेव स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार निवडून आले तर उर्वरीत जागेमध्ये भटकर एल.एस. (चिखली-मेहकर) केशव जानूजी खंडारे (अकोला-बाळापूर) आणि गणेश आकाजी गवई (अचलपूर-दर्यापूर-मेळघाट) हे काँग्रेस समर्थित उमेदवार निवडून आले.अमरावतीमधून उभे असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुखांना केवळ चार मतांनी जी. आर. देशमुख यांनी पराभूत केले. अकोला अमरावती स्त्री विभागातून विमलाबाई देशमुख यांचा दुर्गाताई जोशी यांनी पराभव केला. एकंदरीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच निवडणुकांना सामोरे जावे लागल्याने पक्षबांधणीस, पक्षाची भूमिका, ध्येय कार्यक्रम समजावून सांगण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. डॉ. पंजाबराव देशमुख सारखे मोजके पुरोगाणी नेते सोडले तर इतर स्पृश्य हिंदू नेते स्वतंत्र मजूर पक्षाकडे आले नाहीत.

कालांतराने डॉ. पंजाबराव देशमुख यांची काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रांत वर्‍हाडातून घटना समितीवर निवड करण्यात आली.९ डिसेंबर १९४६ ते २६ नोव्हेंबर १९४९ चा जवळजवळ तीन वर्षांच्या कालावधीत पंजाबरावांनी संविधानसभेच्या वादविवादात भाग घेतला. बहुसंख्य सदस्य काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे त्यांना पक्षशिस्तीची बंधने पाळावी लागत असत.२५ नोव्हेंबर १९५० रोजी संविधान सभेत केलेल्या संस्मरणीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘जर सर्व सदस्यांनी पक्षशिस्तीचे नियम काटेकोरपणे पाळले असते तर संविधानसभेचे कामकाज फारच कंटाळवाणे झाले असते. पक्षशिस्त कडक असती तर संविधानसभेचे रुपांतर होयबांच्या मेळाव्यात झाले असते. सुदैवाने काही सदस्य बंडखोर निघाले. त्यांच्यामध्ये ह. वि. कामथ, डॉ. पंजाबराव देशमुख, रुस्तम के. सिध्वा, प्रा. शिब्बनलाल सक्सेना आणि पंडित ठाकूरदास भार्गव होते. त्यांच्याबरोबरच मला प्रा. के. टी. शहा आणि पंडित हृदयनाथ कुंझरु यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेले बरेचसे मुद्दे विचारप्रणालीविषयी होते. त्यांनी केलेल्या सूचना स्वीकारण्यास मी तयार झालो नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचनांचे मूल्य कमी होत नाही. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. ते नसते तर संविधानामागची तत्त्वे स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली नसती. तांत्रिकरित्या संविधान पारित करुन घेण्यापेक्षाही ते जास्त महत्त्वाचे होते.’ (वसंत मून (संपादक) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँड स्पीचेस : खंड १३, १९९४; पृष्ठ १२०९) अर्थात बाबासाहेब देखील भाऊसाहेबांच्या सूचना आणि मुद्द्यांचे समर्थन करीत असत.त्याच भाऊसाहेबांनी ओबीसीच्या हक्कासाठी कलम ३४० अंतर्गत घटनेत समावेश करावा असा आग्रह बाबासाहेंबाना केला होता.मात्र भाऊसाहेबांच्या जीवनावरील कुठल्याही पुस्तकात स्वतंत्र मजूर पक्ष,मध्यप्रांत वऱ्हाडमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष तर्फे उभयतांनी लढविलेल्या निवडणुका ह्याचा दुर्दैवाने जाणीवपूर्वक उल्लेख येऊ दिला जात नाही.इतिहासाच्या प्रतारणेचे हे अलीकडच्या काळातील मोठे उदाहरण आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र राज्य
९४२२१६०१०१.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!