
“दहशतवाद्यांच्या दहशतीचा जेथे उगम होतो तेथेच त्यांना नेस्तनाभूत करा.”
हा सल्ला अजित डोभाल यांनी दिला होता. त्यानुसार पहेलगाम घटनेनंतर दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला.त्यात नक्की किती आणि कोण दहशतवादी मारले गेले हे समजले नाही. पण दोन्ही देशात युद्ध झाले. दोघांचे मोठे नुकसान झाले. यातून पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशत वादी कारवाया थांबतील का? हिंदू मुस्लिम कटूता कमी होईल का?
माझ्या मते ‘मुळीच नाही!’
डोभाल व आर्मी प्रमुखांनी हा एकत्रित निर्णय घेतला असे सांगितले जाते.
एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून डोभाल यांचे कार्यही प्रचंड मोठे आहे. म्हणूनच त्यांना भारतातील जेम्स बॉण्ड म्हटले जाते आणि ते खरे आहे. त्यांचे बद्दल आदर असला तरी त्यांचे सर्वच निर्णय योग्य असतील हे मान्य करणे शहाणपणाचे ठरणार नाही असे वाटते.
डोभालजी तुमची थीअरी पूर्णपणे चुकीची आहे. दोन्ही देशातील वातावरण तापल्यावर कोणीही मुख्य दहशतवादी जिथे दहशतवादी घडविले जातात त्या ठिकाणी राहणार नाहीत. राहतात ते झाडलोट करणारे, स्वयंपाक बनवणारे, वॉचमन,…., उपाशीपोटी लोक, निर्जीव भिंती व छत. त्यांच्यावर बॉम्ब टाकून त्यांच्या मुख्य दहशतवादी नेत्यांच्या डोक्यातील आकस कमी होणार नाही. तो वाढत जाईल. डोभाल सर आतंकवाद हा दगड सिमेंट वाळू यांनी बनवलेल्या निर्जीव इमारतीत निर्माण होत नाही तो मानवी मेंदूमध्ये निर्माण होतो. त्या मेंदूवर सकारात्मक पद्धतीने स्ट्राईक करण्याची गरज आहे. त्यासाठी राफेल विमाने अगर मिसाइल्स नको. त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम आतंकवादी विचाराच्या लोकांची डोकी थंड आणि मानवी बनवण्यासाठी तुम्हाला भिवंडी प्रयोग/ मोहल्ला कमिटी प्रयोग अभ्यासावा लागेल. पण इथले आर्य ब्राह्मण तुम्हाला तसे करू देणार नाहीत. ब्राह्मणी वर्ण श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी त्यांनी मुस्लिम हा काल्पनिक शत्रू निर्माण केला आहे. आम्हा गुलामांना ते खरे वाटते. तुम्हालाही मोठा मान सन्मान देतात. आत्ता तुम्हाला केंद्रीय कॅबिनेट मध्ये सातव्या क्रमांकाचा दर्जा दिलेला आहे पण आपल्या धर्मातील तुमचा वर्ण दर्जा तोच राहतो. असो.
डोवाल सर तुम्ही आमचे आदर्श आहात. 1968 साली तुम्ही डायरेक्ट आयपीएस म्हणून पोलीस दलात आलात तर मी 1978 साली राज्य सेवेतून डायरेक्ट डी वाय एस पी म्हणून निवडला गेलो. नोकरीतील चौथ्या वर्षीच मला तुमच्याप्रमाणेच राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले. भिवंडी प्रयोगानंतर तुमच्याप्रमाणेच राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. या प्रयोगावर मार्गदर्शन करण्यासाठी मला स्विझर्लंड व ऑस्ट्रेलिया मधील युनिव्हर्सिटी, , युनो तर्फे काठमांडू आणि आणि चायना येथे भरलेल्या जागतिक परिषदांमध्ये हा प्रयोग सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. चीनमधील परिषदेत हा प्रयोग सर्वोत्कृष्ट ठरला होता.पण मी डायरेक्ट आयपीएस नसल्याने व इथल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवल्यामुळे तुमच्यासारखे ग्लॅमर मिळाले नाही. शिवाय त्याकाळी असलेले काँग्रेस सरकार हे स्वतःचा स्वार्थ ,घराणे व गणगोत या पलीकडे पाहत नव्हते त्यामुळे हा प्रयोग मागे पडला.
डोभाल सर, आपण दोघांनीही भारतातील पोलीस दलात आयपीएस केडर मध्ये नोकरी केलेली आहे. पण पाकिस्तान मधील काही तळावर बॉम्ब फेकून भारतातील दहशतवाद थांबणार नाही व हिंदू मुस्लिम एकता निर्माण होणार नाही हे आपणास माहित आहे. आपल्याला हिंदू मुस्लिम तणाव नष्ट करून एकता निर्माण करणारे मॉडेल हवे आहे.त्या दृष्टीने भिवंडी प्रयोग किंवा तुम्ही राबवलेले कोणतेही मॉडेल आपण राबवूया
डोवाल सर तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा वापर देशप्रेम या नावाखाली इथल्या आरएसएस आणि ब्राह्मणवादी लोकांचा हेतू साध्य करण्यासाठी केला जात आहे.
“दहशतवाद्यांच्या दहशतीचा जेथे उगम होतो तेथेच त्यांना नेस्तनाभूत करा.” अशा चुकीच्या थीयरिज तुमच्या तोंडी घातल्या जात असाव्यात असे माझ्यासारख्या अनुभवी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास वाटते.
सुरेश खोपडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत