
या अधिवेशनात सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात विधान परिषदेत दहा बैठकांमध्ये सुमारे ७१ तासांहून अधिक काम झालं. या दरम्यान विधानसभेनं संमत केलेली १४ विधेयकं विधानपरिषदेनं संमत केली. विधानसभेत दहा बैठकांमध्ये सुमारे १०१ तास दहा मिनिटं काम झालं. या दरम्यान १८ विधेयकं संमत झाली.अधिवेशनानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. अधिवेशनात पारित झालेल्या विधेयकांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले, २९ सिंचन प्रकल्पांना निधीची तरतूद केली असून, कांद्याची महाबँक स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सुद्धा अधिवेशनात सकारात्मक चर्चा झाली असून, न्यायालयात टिकणारं आणि दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत