समतेसाठीच्या संघर्षाचा जिवंत प्रत्यय देणारा चित्रपट : सत्यशोधक…

डॉ. अनंत दा. राऊत
चित्रपट अथवा कोणतेही माध्यम देशातील जनमानसाला प्रगल्भ अशा प्रागतिक मनोभूमिकेडे घेऊन जाण्यासाठी वापरायचे असते. परंतु वर्तमानातील विशेषतः इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे सत्ताधाऱ्यांची बटीक बनलेली दिसतात. वर्तमान काळाने काही चित्रपट देखील विशिष्ट विचारधारेच्या मंडळींकडून विशिष्ट समाज घटकांबद्दल भयंकर द्वेष आणि तिरस्कार पसरवण्यासाठी निर्माण केलेले दिसले. अशा अवस्थेत चित्रपट रसिकांच्या समोर आलेला ‘सत्यशोधक’ हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. हा चित्रपट विविधतेने नटलेल्या आणि उच्चनीचतावादी जातीयतेने फाटलेल्या, अंधश्रद्धेने बरबटलेल्या जनमानसाला प्रगल्भ अशा प्रागतिक दिशेने घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदतगार होणारा आहे.
काल दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट पाहिला. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमायी फुले यांनी समाजातील धर्म जातीवर आधारलेली विषमता संपवून समता व मानवता प्रस्थापित करण्यासाठी दिलेला संघर्ष या चित्रपटात जिवंतपणे साकार केलेला आहे. ज्योतीराव आणि सावित्री यांच्या विवाह प्रसंगापासून या चित्रपटाची सुरुवात होते. आणि पुढे त्यांच्या जीवनातील एक एक महत्त्वपूर्ण असा संघर्ष प्रसंग प्रेक्षकांच्या समोर येत जातो.
ज्योतीरावांच्या वडिलांचे त्यांना शाळेत पाठवण्यास विरोध करणे, अखेर त्यांचे शाळेत जाणे, ब्राह्मण मित्राच्या कुटुंबातील लग्नाच्या वरातीतून ज्योतीरावांना शूद्र म्हणून हाकलून देणे असे अनेक प्रसंग चित्रपटातून जिवंतपणे साकार केलेले दिसतात. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांची दमदार भूमिकाही प्रेक्षकांवर फार प्रभाव टाकून जाते.
वर्तमानात स्वतःला उच्चवर्णीय म्हणवून घेणाऱ्यांचा आणि मधल्या, खालच्या स्तरात ठेवलेल्या लोकांचा देखील जातीय अहंकार बऱ्याच प्रमाणात वाढलेला दिसतो. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या आभाळव्यापी मानवतावादी कार्याला नीटपणे समजून न घेता त्यांच्यावर अंधपणे गरळ ओकणारे उच्च लोक आजही आहेत. हा चित्रपट महात्मा ज्योतीराव फुले यांचा संघर्ष ब्राह्मण जातीतील माणसांच्या विरुद्ध नव्हता. तर तत्कालीन ब्राह्मणांच्या अहंकारी, इतर समाज स्तरातील लोकांना हीन लेखणाऱ्या व त्यांचे मानवी हक्क नाकारणाऱ्या अमानुष प्रवृत्तीच्या विरुद्ध होता हे स्पष्टपणे लक्षात आणून देतो. महात्मा फुले ब्राह्मण जातीतील काशीबाई या विधवा अवस्थेत गरोदर राहिलेल्या आणि आत्महत्या करण्यास निघालेल्या मुलीला वाचवतात. तिचे बाळंतपण सावित्रीमायीकडून स्वतःच्या घरी करतात. तिच्याच मुलाला दत्तक घेतात. मुलींना शिक्षण देण्याच्या कार्यामध्ये महात्मा फुले यांचे वडीलच सुरुवातीला विरोधी असतात पण काही ब्राह्मण आणि मुस्लिम देखील त्यांच्या सहाय्याला येतात. (भिडे, फातिमा शेख) हे यातील खास मानवतावादी प्रसंग आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर घोले यांचे प्रेम संबंध कसे या चित्रपटातून साकार होतात तसेच त्यांच्या झालेले काही मतभेदही पुढे येतात. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची अत्यंत अहंकारी आणि शूद्र द्वेषी भूमिकाही यात साकार झालेली आहे. विष्णुशास्त्री मरणासन्न अवस्थेत असताना त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी डॉक्टर घोले यांना त्यांच्याच माणसांकडून बोलावले जाते. परंतु मी मरण पत्करेन पण शूद्राकडून उपचार घेणार नाही, असे विष्णुशास्त्री म्हणतात. हा प्रसंग फार अंगावर येणारा आहे.
या चित्रपटातील वेशभूषा, केशभूषा ऐतिहासिक पात्रांच्या चेहऱ्याशी जुळतील अशा चेहरेपट्टीचे अभिनेते हे बहुतांशी चांगले जुळून आलेले आहे.संदीप कुळकर्णी यांचा चेहरा महात्मा ज्योतीराव फुले यांच्या चेहऱ्याशी बराचसा जुळलेला दिसतो. वेशभूषा, केशभूषा चांगली जमलेली आहे. पण या चित्रपटातील महात्मा फुले ज्या पुणेरी प्रमाण भाषेमध्ये बोलताना दिसतात ती भाषा मात्र खास महात्मा फुल्यांची वाटत नाही. महात्मा फुलेंचे साहित्य वाचले तर त्यांच्या भाषेमध्ये एक गावरान रांगडेपणा होता हे सहजपणे लक्षात येते. हा भाषेचा अस्सल रांगडेपणा चित्रपट निर्मात्यांना पकडता आलेला नाही. सावित्रीमायींचे लोकांमध्ये प्रचलित असलेले वेगवेगळे फोटो आहेत. पण महात्मा फुले यांच्या अस्सल जीवन चरित्राचे व साहित्याचे संशोधक हरी नरके यांनी संशोधनातून पुढे आणलेला सावित्रीमायीचा अस्सल फोटो अजून जास्त प्रचलित झालेला नाही. यातील राजश्री देशपांडे यांनी साकार केलेली सावित्रीमायी काहीशी अस्सल फोटोतल्यासारखी दिसते.यामध्ये क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांची भूमिका मात्र फोटोतील क्रांतीगुरूंना भेटल्यासारखीच जिवंत झालेली दिसते. महात्मा फुले यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील त्यांचे दिसणे केशभूषा व वेशभूषेच्या माध्यमातून चांगले साकार केले आहे. विशेषत: वृद्धत्वाच्या काळातले महात्मा फुले अधिक अस्सल वाटतात. महात्मा फुले यांना जेव्हा अर्धांगवायुचा झटका येतो तो प्रसंग फारच जिवंत झालेला आहे. तो प्रेक्षकांच्या मनावर फार मोठा परिणाम करतो. आता इथे सारेच सांगत बसत नाही. सर्वाच मानवतावादी मंडळींनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे.हा चित्रपट समता फिल्म्स व अभिता फिल्म प्रोडक्शनने निर्माण केलेला आहे. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट अनेक मान्यवरांच्या सोबत पाहण्याची संधी युवक काँग्रेसचे उत्साही कार्यकर्ते श्री. विठ्ठल पावडे यांनी दिली. हा चित्रपट पाहण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, काही माजी आमदार, साहित्य क्षेत्रातील अनेक लेखक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा. असे मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत