शिक्षणात ‘मनुस्मृती’ : प्रतिक्रांती ची नांदी

लेखक – जगदीश माने
‘जे जे पुरातन ते ते श्रेष्ठ’ हा मनुवादी ब्राह्मणांचा मानसिक खेळ आहे. मागील काही काळापासून त्यांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेला वेठीस धरले आहे. जिथे जागतिक दृष्टीकोनातून भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवतेचा ऊहापोह होणे गरजेचे आहे, जिथे वैज्ञानिक दृष्टिकोण कसा रुजवता येईल हा महत्वाचा व गरजेचा मुद्दा आहे , जिथे सरकारी शाळा खूप मोठ्या प्रमाणात संपवल्या जात आहेत , जिथे शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जात नाही , तिथे या मूलभूत प्रश्नांची चर्चा करण्याऐवजी विषमताजनक मनुस्मृती ग्रंथातील श्लोक अभ्यासक्रमात टाकण्यास अग्रक्रम देणे म्हणजे बहुजन समाजाला व संपूर्ण देशाला अंधारयुगात पाठवणे होय. अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गंभीर बाब भावी पिढीच्या भवितव्यावर परिणाम करू शकते , हे या शहाण्यासुरत्या मंडळींना का समजत नाही ? देशाला विश्वगुरु करण्याची स्वप्ने दाखवताना कोणी पुरातन आणि कालबाह्य संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला विरोध हा होणारच ! मग अशा नौटंकी करणाऱ्यांनी देशप्रेमाचा कितीही मुखवटा चढवला तरी त्यांना अगदी सहज ओळखता येते. देशप्रेम म्हणजे दलित समाजाला भगव्या गोटात सामील करून घेण्याचा प्रयत्न करणे वा शालेय अभ्यासक्रमात ब्राह्मणी अंगाने लुडबुड करणे नव्हे. विशेषतः मनुस्मृती अभ्यासक्रमावरील अतिक्रमण ही बाब तर अजिबात दुर्लक्ष करण्याजोगी नाही.
शिक्षणव्यवस्थेत मनुवादी हस्तक्षेप नेमके काय करतो ? तर शिक्षणाचे हिंदुत्वीकरण आणि शिक्षणाचे आक्रमक खाजगीकरण या दोन्हींसाठी आवश्यक ती चौकट प्रदान करतो. त्यामुळे आता केवळ इतिहासच नाही तर संपूर्ण शिक्षणाकडेच तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ‘शिक्षणाचे भागविकरण’ हे हिमनगाचे केवळ एक टोक केवळ टोक आहे. त्याच्याखाली शिक्षणाच्या कॉर्पोरेटायझेशनचा मोठा व छुपा अजेंडा अंतर्भूत आहे , हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दशकात गुजरात राज्यांत नैतिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भगवद्गीतेचा समावेश करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ‘आपल्याला आपल्या पुरातन मुळांकडे परत जायचे आहे, आपल्या संस्कृतीची आणि वारशाची महानता जाणून घ्यायची आहे आणि आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये किती मोठा खजिना आहे हे समजून घ्यायचे आहे’ अशा मानसिकतेकडे बहुजन समाजाला ओढण्याचे प्रयत्न चालले आहेत. ते नुकसानदायक आहेत. कळीचा मुद्दा असा कि , ते संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे.
म्हणून सर्वच विषय ब्राह्मणी धर्मसंस्कृतीच्या चौकटीत बसवण्याचा अट्टहास करणे हे अजिबात शहाणपणाचे नाही. शिक्षणव्यवस्थेला घालू पाहणारी ही ब्राह्मणी धर्मसंस्कृतीची चौकट हा खरा आक्षेपाचा मुद्दा आहे.
दुसऱ्या बाजूला त्या त्या राज्यात मातृभाषेला स्थान देत असताना इंग्रजी भाषेला ऐच्छिक बनवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकणे होय. आपल्या समाज सुधारकांनी इंग्रजी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. अभ्यासक्रम- नोकरी , जगव्यवहार या सर्वांत इंग्रजीचे महत्व असताना इंग्रजीला महत्व न देणे हे बहुजन समाजाच्या भविष्याशी खेळणे आहे. एक बाजूला मराठी शिक्षणाची सक्ती आणि दुसऱ्याबाजूला इंग्रजी ऐच्छिक करणे हा घातक प्रयोग आहे. देशातील शासकीय कामे , कायदेरचना ही इंग्रजी भाषेत चालतात. म्हणून इंग्रजी लिहिता वाचता येणे गरजेचे आहे. विज्ञानातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी देखील इंग्रजी आवश्यक आहे. अशा इंग्रजीला ऐच्छिक ठरवून मराठी भाषेची सक्ती करणे कोणत्या तत्वात बसते ? जे इंग्रजीला डावलून मराठीची सक्ती करतात ते आपल्या मुलीमुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत घालतील का ?
लक्षात घ्या , याच शिक्षणाच्या जोरावर एक दलित मध्यमवर्ग तैयार झाला आहे जो प्रस्थापित चौकटीला अनेक टोकदार प्रश्न विचारीत आहे. ही बाब ज्यांना खटकते आहे ते शिक्षणव्यवस्थेची ढाल पुढे करून समाजाला अधोगतीकडे नेत आहेत. या दृष्टीने दलित बहुजन समाज हा मनुवादी ब्राह्मणांच्या गेम प्लॅनचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय लोकसंख्येचे हिंदू विरुद्ध इतरांमध्ये ध्रुवीकरण करणे , मुस्लिम, ख्रिश्चन यांना वेगळे पाडून तसेच दलित - बहुजन यांच्या शैक्षणिक प्रगतीला मनुवादी लगाम घालून या देशाचा विकास होणार नाही. जे या ध्येयधोरणांशी सहमत नाहीत त्यांना लक्ष्य करण्याची हा कपटी कावा असू शकतो. एकविसाव्या शतकाचे पाणी चाखलेला हा जागृत बहुजन समाज यापुढे मनुवादी ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिण्याची शक्यता फार कमी आहे. या समाजाच्या जडणघडणीत देशातील समतावादी विचारसरणी , ऐतिहासिक वारसा , सामाजिक आंदोलने , सुदृढ वैचारिक सांस्कृतिक संचित यांत मनुवादी ब्राह्मणांच्या अजेंड्याला बिघडवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच संघ परिवाराच्या रणनीतीत महात्मा फुले - डॉ आंबेडकर यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जोपर्यंत या गुरूशिष्यांचे पुरेसे भगवेकरण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखालील जनता संघ परिवाराच्या विळख्यात येत नाही. या जनतेने हिंदू धर्माला नकार दिल्याने संघ परिवाराच्या प्रयत्नांना त्रास होत राहील.
आज देशभरातच नव्हे तर अनेक जागतिक विद्यापीठांत महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांच्यावर विविधांगी संशोधन होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते पटकन जगाच्या कानाकोपऱ्यांत देखील पोहोचते आहे. जागतिक पार्श्वभूमी असलेला व आधुनिकतेची कास धरणारा , धर्मनिरपेक्ष विचारसरणी मानणारा समूह हे आजच्या भारताचे खरे बलस्थान आहे. या बलस्थानाची जाणीव परिवर्तनवाद्यांना आहे काय ? हाच खरा प्रश्न आहे. हे बलस्थान विचारात घेतले तर मनुस्मृती भक्तांचे आव्हान परतवणे ही काही मोठी गोष्ट नाही !
—- जगदीश माने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत