महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

२४ मार्च वंचित बहुजन आघाडी स्थापना दिन

        

वंचित बहुजन आघाडी हा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षा सोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाली. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत. या पक्षाने AIMIM पक्षांसह १७ व्या लोकसभा निवडणुकी मध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर AIMIM उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंचितचे उमेदवार उभे होते. या युतीतील एकमेव AIMIM चा उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले तर वंचितचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकी मध्ये वंचित व AIMIM ने एकत्रित ७.६४ टक्के मते मिळवली. तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख या वंबआ प्रदेश प्रवक्त्या आहेत. त्या राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी आहेत. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंबआ पक्षाने २८८ ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि ४.६% मतदान म्हणजेच २४ लाख मतदान घेतले. यावरून पुढील निवडणुकीत वंबआ पक्ष महत्त्वाचा ठरेल.

इतिहास व पार्श्वभूमी :
१९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता. आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून ‘अकोला पॅटर्न’ राबविला आणि जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या १६व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर राज्यात २३ उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. २०१४ मध्ये झालेल्या १३व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर ७० उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. २० मे २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात ‘वंचित बहुजन आघाडी’ हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अश्या समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या.

जून २०१८ मध्ये लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल अशा प्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. २४ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत ‘राजकीय पक्ष’ म्हणून मान्यता दिली आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाली. त्यानंतर AIMIM या आघाडीत सहभागी करण्यासाठी AIMIM पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी AIMIM चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबाद मधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि ओवैसी पक्ष आघाडी मध्ये सहभागी झाला. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत महाराष्ट्र मध्ये राज्यभर सभा मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाज घटकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. या सभेचे अध्यक्ष आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत ओबीसींच्या हक्का बद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत, त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा, याचप्रमाने झोपडपट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता. या आघाडीने घेतलेल्या सभांना आता पर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजप विरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेस पुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी AIMIM ची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या. “आम्ही काँग्रेस समोर १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २२ जागा बाबतही चर्चा होती. पण ती देखील बारगळली आहे” असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले. १४ मार्च २०१९ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा अकोला पॅटर्नला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकी नंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची युती तुटली.

निवडणूक चिन्हे :
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टी व पतंग ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले होते.

ध्वज :
३१ मार्च २०१९ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळा व हिरवा रंग घेतलेला आहे.

जाहीरनामा :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने आपला डिजीटल जाहिरनामा प्रसिद्ध केला, ज्यात ‘भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा’ असल्याचे सांगितले.
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!