वेळीच सावध व्हा

पंकज वैद्य
आता प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशवासीयांना दिली. मुळात संविधानाला हात लावण्याचा प्रश्न उद्भवलाच कसा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांकडून संविधान बदलण्या करता चारशे पेक्षा जास्त जागा जिंकणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी विरोधक संविधान बदला विषयीचा खोटा आरोप भारतीय जनता पक्षावर करत आहे असे म्हणण्याला अर्थ उरत नाही. ज्या नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. त्यांना जर भारतीय जनता पक्षातून निष्कासित करण्यात आले असते तर मोदींच्या ग्वाही मध्ये काही दम आहे असे निश्चितपणे वाटले असते. दुसरी बाब म्हणजे घटनेचे जन्मदाते बाबासाहेब आंबेडकर घटना बदलण्या करता कशाला येतील हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याकाळी या संविधानाला विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर सेनापतीचे नाव घेऊन. जर असे काही विधान करण्याचे हिम्मत नरेंद्र मोदी यांनी दाखवली असती. तरी सुद्धा त्यामधून त्यांचे संविधाना प्रतीचे प्रेम दिसून आले असते. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संविधान समितीमध्ये काम करणाऱ्यात नव्वद टक्के सभासद सनातनी होते. घटना निर्मिती नंतर पंचाहत्तर वर्षांनी लागलेला हा शोध आहे. परंतु या घटना समितीमध्ये खरोखरच नव्वद टक्के सनातनी असते. तर घटनेला सर्वधर्मसमभावाचा चेहरा मिळाला असता का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कसली घटना जिच्यावर मनुस्मृतीचा प्रभाव नाही असे म्हणणारे सनातनी त्यावेळी घटना समितीच्या बाहेर बसले होते. जर भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आपले संविधान बदलले जाणार आहे का असा विचार करण्यापेक्षा आज देश संविधाना नुसार चालत आहे काय याचे उत्तर शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या राज्यकर्त्याचे वर्तन जर संविधानाची चाकोरी सोडून केलेले वर्तन आहे असे आपल्याला वाटत असेल. तर उद्या ते बदलल्या जाईल का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथेच सापडून जाईल. संविधानाला धक्का लागू देणार नाही या विधानात तसा काहीच अर्थ नाही. कारण संविधानाला धक्का लागलेला आहे. आता पुढची वाटचाल ते बदलवण्याच्या दिशेने होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही उतावळ्या नेत्यांनी निवडणुकी पूर्वीच राज्यघटना बदलण्याचे आपले मनसुबे जाहीर केल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर आता सावरासावर करण्याची वेळ आलेली आहे.
धर्माच्या नावाने मत मागणे हे आमच्या घटनेला मान्य नसले. तरी आज हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेतून राजरोसपणे सुरू आहे. यांचे एक नेते टी. राजा यांच्या जवळ तर किती मंदिर बांधून काढायची आहेत याची भली मोठी यादीच आहे. ती यादी ते जाहीर सभेमधून वाचून दाखवत आहेत. यावेळी कारसेवकांवर पुष्पवृष्टी करण्याची भाषा ते बोलत आहेत. स्वतः पंतप्रधान आपल्या भाषणामधून राम नावाचा गजर करत आहेत. गृहमंत्री अमित शहा हातामध्ये देवाचा फोटो घेऊन फिरत आहेत. माझा पराभव झाला तर तो श्रीरामाचा अपमान ठरेल. असे टीव्ही सिरीयल मध्ये रामाची भूमिका करणारे अरुण गोविंद सांगत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी जय हनुमान म्हणत मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी निद्रिस्त असलेला निवडणूक आयोग अजून पर्यंत आपल्या कुंभकर्णी निद्रे मधून बाहेर पडलेला नाही. या आयोगाची भीती कोणाला असेल तर ती फक्त निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि विरोधकांना. एखाद्या गुन्हेगाराची झडती घ्यावी त्याप्रमाणे राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर तपासण्याचा वायरल झालेला व्हिडिओ सर्वांनीच बघितला आहे. ज्या देशाचा निवडणूक आयोगच निष्पक्ष नसेल त्या देशाचे संविधान सुरक्षित आहे असे म्हणणे निश्चितच धाडसाचे ठरणार आहे. एका नेत्याची प्रशासकीय सेवेत उच्च पदावर असलेली मुलगी चक्क प्रचार यात्रेत फिरताना दिसून येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मात्र शब्दांचा वापर जरा जपून करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवून त्याला आर्थिक दृष्ट्या अपंग म्हणून टाकले आहे.विरोधी पक्षाला संपवून टाकण्याचा विडाच उचलला असल्याचे वातावरण देशामध्ये असताना. अजून संविधानाला धक्का लागला नाही असे ठामपणे सांगण्यात येत आहे. ते हेच संविधान आहे ज्याने संसदेत सशक्त विरोधी पक्षाच्या उपस्थितीची आवश्यकता नमूद केलेली आहे.
निवडणूक रोख्यां विषयीची माहिती जनते पर्यंत पोहोचावी म्हणून काँग्रेस पक्षाने ती जाहिरातीच्या स्वरूपात पैसे देऊन छापण्याची केलेली विनंती वृत्तपत्रांनी धुडकवून लावलेली आहे. आयकर विभाग, इडी, सीबीआय तर विरोधकांवर तुटून पडले आहेत. संविधानाच्या चौकटीत या सर्व गोष्टी सहजसाध्य होतील याची कल्पना तर संविधान कर्त्यांना सुद्धा नसावी. स्वातंत्र्या नंतर पासष्ट वर्षे या संविधानाला कसे नख लावता येईल याचा सखोल अभ्यास झाला असावा. पासष्ट वर्ष अभ्यास केल्या नंतर. सत्ता हातात आल्यावर आता या संविधानाच्या अमृत काळातच त्याच्यावर अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आलेली आहे. ‘स्वतंत्र दिन चिरायू हो’, ‘प्रजासत्ताक दिन चिरायू हो’,’भारताचे संविधान चिरायू हो’ या घोषणा केवळ त्या त्या दिवसाचे औचित साधत देण्या पुरता मर्यादित राहिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या माणसाला उचलून थेट तुरुंगात डांबल्या जात असेल. तर संविधान बदलवून याच्यापेक्षा आणखीन वाईट काय करू शकणार आहे असा प्रश्न निर्माण होतो. केजरीवाल तुरुंगात गेले ते आत्महत्या करण्या करता की त्यांना तुरुंगात टाकले ते तुरुंगातच त्यांना संपवण्याच्या दृष्टीने असा प्रश्न आता निर्माण होत आहे. त्यांची शुगर लेवल तीनशे पर्यंत वाढलेली आहे. ते जाणीव पूर्वक गोड खाऊन आपली शुगर लेवल वाढवत असल्याचा दावा ईडी कडून केला जात आहे. इडीच्या या दाव्याच्या समर्थनार्थ संपूर्ण गोदी मीडिया अरविंद केजरीवाल यांना घेरायला निघाली आहे. तर केजरीवालांना आवश्यक असणाऱ्या इन्सुलिनचा पुरवठा सुद्धा तुरुंगात करण्यात येत नसल्याचा दावा आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. केजरीवाल यांना जेवणाचा डबा, चहा इत्यादी सामग्री त्यांच्या घरून पोहोचवली जात आहे. घरून खाण्याचे साहित्य येत आहे याचा अर्थ ते साहित्य त्यांच्या पत्नीच्या निगराणीतूनच येत असणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही पत्नी आपल्या पतीच्या जीवावर बेतेल अशा प्रकारचे अन्न त्याला पाठवणार नाही हे स्पष्ट आहे. कोणत्याही डायबिटीसच्या पेशंटला गोड खायचे असेल तर आपल्या पत्नीच्या लपूनच खावे लागते. लोकांनी निवडलेला एक मुख्यमंत्र्याच्या जीवनाचा प्रश्न असताना तुम्ही दावे प्रतिदावे करण्यात मग्न आहात. संविधानाची हत्या झाल्याचे आरोप वरचेवर होत असतात. संविधान जर तुम्हाला आरक्षण देत असेल. तर त्या आरक्षणाला धक्का न लावता खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्याच संपवून टाकल्या तर संविधानाला धक्का लावल्याचा आरोप कसा करता येईल. आपल्या मर्जीला येईल त्याप्रमाणे वाकवण्या इतपत संविधान लवचिक असेल तर चारशे पार न जाता सुद्धा त्याचा भरपूर दुरुपयोग केला जाऊ शकतो. मग संविधान बदलण्याची गरजच काय असा प्रश्न पडतो. आज देवदेवतांच्या नावे मतं मागितली जात आहेत आमच्या या देव देवता जेवढ्या जुन्या आहेत. तेवढाच जुना आम्हा बहुजनांच्या गुलामगिरी चा इतिहास आहे. उच्च वर्णीयांची गुलामगिरी. या गुलामगिरीतून मुक्त होऊन मोकळा श्वास घ्यायला जेमतेम पंचाहत्तर वर्षे उलटली आहेत. हा मोकळा श्वास आम्हाला आमच्या संविधानाने दिलेला आहे. घटना बदलण्याच्या गोष्टी करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहाल. तर परत एकदा हा मोकळा श्वास कोणाच्या तरी चरणी गहाण टाकायला तुम्ही निघाला आहात एवढाच त्याचा अर्थ होतो. घरात पसारा करायला फार सोपं जातं. परंतु तो पसारा आवरायला घेतला की कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही. आजच्या परिस्थितीत संपूर्ण देशामध्ये पसारा करण्याचे काम सुरू आहे. आवरण्याचे काम हातात घ्याल त्यावेळी देशाचेच कंबरडे मोडले असेल. असे व्हायला नको असेल तर वेळी सावध व्हा एवढेच.
पंकज वैद्य
9823014040
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत