दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

समाजवादी भारताचे स्वप्न पाहणारा धर्मनिरपेक्ष नेता:भगतसिंग

                      -प्रा डी डी मस्के

(९३ व्या शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन)

भगतसिंगाचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा या गावात सरदार किशनसिंग व विद्यावती यांच्या पोटी झाला. भगतसिंग जन्माच्या वेळी त्यांचे वडील व सख्खे काका तुरुंगात होते. हे शिख कुटूंबीय आर्यसमाजाचे अनुयायी होते. तुरुंगातील छळामूळे त्यांचे काका सरदार स्वर्णसिंग यांचा तेविसाव्या वर्षी मृत्यू झाला होता. तर दुसरे काका सरदार अजितसिंग “गदर” या सशस्त्र क्रांतीकारकांच्या संघटनेचे नेते होते. म्हणजेच भगतसिंगाचे संपुर्ण घराणेच आधुनिक विचारांचे आणि देशभक्त होते. भगतसिंगाना देशभक्तीचे बाळकडू अगदी जन्मापासूनच मिळत गेले.

भगतसिंग ८ वर्षाचे असताना म्हणजे १९१५ मध्ये “गदर पार्टीचा” १८ वर्षाचा कोवळा नेता कर्तारसिंग सराभाला फाशी देण्यात आली. या घटनेचा जबरदस्त प्रभाव भगतसिंगावरती झाला. कर्तारसिंग भगतसिंगाचा आदर्श बनला. कर्तारसिंगाचा फोटो ते आपल्या खिशात बाळगू लागले.
भगतसिंग १२ वर्षाचे असताना म्हणजे १९१९ मध्ये मानवतेला काळीमा फासणारे जालियनवाला बाग हत्याकांड घडले. जनरल डायरने नि:शस्र जमावावर गोळीबार केला. यात ३७९ लोक ठार झाले व १२०० लोक जखमी झाले. या घटनेचा भगतसिंगाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एक दिवस ते एकटेच जालियनवाला बागेत गेले. देशबांधवाच्या रक्ताने लाल झालेली माती मुठीत घेऊन मस्तकाला लावली आणि या क्रुर अन्यायाचा अंत करण्यासाठी जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली.
भगतसिंग जेमतेम नववी शिकलेले पण राष्ट्रीय काॅलेजचे प्राचार्य लाला छबिलदास यांनी त्यांची परीक्षा घेतली त्यात ते पास झाले. भगतसिंग जेमतेम दिड वर्षे काॅलेजात होते. याच काॅलेजमध्ये त्यांना सुखदेवसारखा वधस्तंभापर्यंत साथ देणारा मित्र मिळाला.

काकोरी कटाचा खटला

हिंदूस्तान रिपब्लिकन आर्मीचे नेते सचिंद्रनाथ सन्याल, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मील, मन्मथनाथ गुप्त, अषफाकउल्ला, राजेंद्र लाहिरी वगैरे होते. क्रांतीकारक चळवळीला लागणारे पैसे जमविण्यासाठी त्यांनी काकोरी येथे ट्रेनवर हल्ला करुन सरकारी खजिना लुटला.
काकोरी कटाच्या खटल्यात,
” सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजूए कातिल मे है” या स्फूर्तीदायक काव्याचे जनक रामप्रसाद बिस्मील व त्यांच्याबरोबर अशफाकउल्ला, राजेंद्र लाहिरी असे हिंदू-मुसलमान क्रांतीकारक एकत्र फासावर गेले.

” समाजवादी प्रजातंत्र संघटना”

दि.८ व ९ सप्टेंबर १९२८ रोजी दिल्लीतील फिरोजशहा किल्ला परिसरात भारतातील सर्व क्रांतीकारकांची एकत्रीत बैठक झाली.या बैठकीला पंजाब मधून भगतसिंग व सुखदेव, राजस्थानातून कुंदनलाल, उत्तर प्रदेशातून शिववर्मा,ब्रह्मदत्त कपूर, जयदेव कपूर, विजयकूमार सिन्हा, सुरेंद्रनाथ पांडे, बिहारमधून फणींद्रनाथ घोष आणि मनमोहन बॅनर्जी आले होते.
भगतसिंगाच्या सूचनेमूळे, सर्व प्रांतातील प्रतिनीधींची एकच केंद्रीय समिती बनविण्यात आली. “हिंदुस्थान रिपब्लिकन असोसियशन” हे पूर्वीचे मध्यवर्ती नाव बदवून “हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन” असे ठेवण्यात आले. नावात समाजवादी शब्द समाविष्ट करावा ही सूचना भगतसिंगानी केली व ती सर्वानुमते मंजूर झाली.

“नौजवान भारत सभेची स्थापना”

काॅलेजमध्ये असताना भगतसिंग, सुखदेव,भगवतीचरण,यशपाल, रामचंद्र कपूर यांनी “नौजवान भारत सभेची स्थापना केली. या सभेचे भगतसिंग जनरल सेक्रेटरी होते.
नौजवान भारत सभेचे उद्दिष्ट, ” गांधीवादी तडजोडवादी दृष्टिकोनाशी वैचारिक संघर्ष करुन जनतेला क्रांतीकारी आंदोलनात सहभागी करणे हे होते.” तसेच

  • जातीधर्माचे भेद नष्ट करणे,
  • जनतेची एकजूट उभी करणे,
  • सहभोजन आयोजित करणे,
  • “कर्तारसिंगाचा” गौरव करणारी सभा लाहोरात घेऊन त्यात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करण्यात आला.
  • कामगार-शेतकऱ्यांचे गणराज्य स्थापन करुन माणसाने माणसाची चालवलेली पिळवणूक नष्ट करणे.

“इन्कलाब झिंदाबाद” व “हिंदुस्थान झिंदाबाद”
या त्यांच्या प्रमुख घोषणा होत्या.

” लेखक भगतसिंग “

अर्जून, प्रताप, प्रभा,महारथी,चांद अशा विविध नियतकालिकांमधून भगतसिंग लिहीत होते. हिंदी, उर्दू, पंजाबी व इंग्रजी या चार भाषेतून ते लिखाण करीत असत. या चारही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. कीर्ती वर्तमानपत्राच्या संपादक मंडळावर भगतसिंग होते.

अटकेत असताना भगतसिंगानी प्रचंड वाचन केले.त्यांनी जयदेव गुप्ता यांना पत्र पाठवून पंजाब पब्लिक लायब्ररीमधून….

  • सिव्हील वाॅर इन फ्रान्स- कार्ल मार्क्स
  • मिलीटरीझम- कार्ल लिबनेख्ट
  • हाऊ मेन फाइट- बर्ट्रान्ड रसेल
  • कोलॅप्स ऑफ सेकंड इन्टरनॅशनल- लेनिन
  • लेफ्ट विंग कम्युनिझम- लेनिन
  • लॅन्ड रेव्होल्युशन इन रशिया-अप्टन सिंक्लेअर
  • हिस्टारीकल मटेरिॲलिझम-बुखारीन
    इत्यादी पुस्तके पाठविण्याची विनंती केली.
    अवघे २३ वर्षे वय असलेल्या भगतसिंगाचे किती प्रचंड वाचन होते हे लक्षात येते.

“सायमन कमिशन व लाला लजपतराय यांचा मृत्यू”

३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन मुंबईत दाखल झाला.त्याला काँग्रेसने प्रचंड विरोध केला. लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय नौजवान सभेने घेतला. त्याचे नेतृत्व लाला लजपतराय यांच्याकडे होते.इंग्रज पोलीसानी या आंदोलन कर्त्यावर व वयोवृध्द लालाजीवरती लाटी हल्ला केला. त्यात लाला लजपतराय यांचा १७ नोव्हेंबर १९२८ रोजी मृत्यू झाला. हा लाटीचार्ज ब्रिटिश अधिकारी स्काॅट व साॅन्डर्स यानी केला होता. लालाजींच्या हत्येमूळे झालेल्या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेतला पाहिजे अशी भगतसिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना केली. यासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, जयगोपाळ यांची निवड करण्यांत आली.
बरोबर एक महिन्यानी म्हणजे दि. १७ डिसेंबर १९२८ रोजी भगतसिंग व राजगुरु यांनी साॅन्डर्सचा खून केला.

असेम्ब्लीत बाॅम्ब

“सार्वजनिक सुरक्षा” व “औद्योगिक कलह कायदा” विधानसभेत (लोकसभेत) फेटाळल्यानंतर व्हाईसरायचा वटहुकूम जारी केला अशी घोषणा करताच भगतसिंग व बटूकेश्वर दत्त यांनी दि ८ एप्रिल १९२९ रोजी जाॅन शुस्टर समोर व भारतीय प्रतिनिधीना इजा होणार नाही अशा पध्दतीने बॉम्ब फेकले.
हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र संघटनेच्या पत्रकात , “बहिऱ्यांना ऐकू जावे यासाठी हा बाॅम्बस्फोट होता.” भगतसिंग व बटूकेश्वर दत्त यांना अटक करण्यात आली.

   "फाशीची शिक्षा"

भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. शिववर्मा, किशोरीलाल, गयाप्रसाद, जयदेव कपूर, विजयकुमार सिन्हा, महावीर सिंह आणि कमलापती तिवारी यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर करण्यात आली.
२३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली.

संदर्भ:-
१- शहिद भगतसिंग एक झंझावात, प्रकाश रेड्डी -लोकवाड़मय गृह, पुणे-२००६
२- भगतसिंग, डाॅ. रुपेश पाटकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाशन, मुंबई-२००६
३- माझं क्रांतीस्वप्न, भगतसिंग अनुवादक,डाॅ गिरीश काशिद,श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर-२००५

              प्रा.डी.डी.डी.मस्के

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!