काय होता नामांतर लढा ???

१९७८ ला मुख्यमंत्री शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वप्रथम विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडला आणि येथूनच खरा वाद सुरु झाला .मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या गोष्टीवरून हा वाद सुरु झाला.मुळात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याच्या बदल्यात बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देणे यात काहीच गैर नव्हते,पण एका खालच्या जातीच्या व्यक्तीचे नाव एका विद्यापीठाला द्यायचे या कल्पनेनेच जातिवाद्यांना मनोमन छळू लागले.मग यातून लोकांना भडकिवण्याचे ,शोषित -वंचीतान्विरुद्ध दंगलीचे फर्मान निघू लागले आणि हाहा म्हणता उभा मराठवाडा या वादाने पेटला.जाळपोळ, हत्या, दंगली यांचेच पेव फुटू लागले.एव्हाना विद्यापीठाचे नामांतर करायचेच या भावनेनेही पेट घेतला.आंबेडकरी नेते आणि समाज यांच्या अथक प्रयत्नांतून पण आंबेडकरी समाजाच्या प्रचंड नुकसानीतून तब्बल१४ वर्षांच्या अथक लढाईतून विद्यापीठाचे नामांतर झाले. नामांतर झालेपेक्षा खरतर नामविस्तार झाला.मराठवाडा हे नाव कायम ठेऊन त्याचे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ” असा नामविस्तारकरण्यात आला.तर असा हा थोडक्यात नामांतराचा लढा.* काय गमावले ?१४ वर्षांच्या या लढ्यातून आंबेडकरी समाजाने काय गमावले ते पुढील आकडेवारीवरून सहज लक्षात येईल:— मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले.- ३४०० कुटुंबाची धूळधाण झाली.- २१०० घरे बेचिराख झाली.- ९२५ स्त्रियांवर बलात्कार झाले.- २४० आंबेडकरी लोक जीवानिशी मारले गेले.( हि सर्व आकडेवारी त्या काळातील प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांतील आहे, माझ्या मनाची नाही. )* आता पाहू काय कमावले ?- नामांतर लढ्याची फलश्रुती एका शब्दात मांडायची झाल्यास , आंबेडकरी समाजाची ( फक्त बौद्ध नव्हे) आणि तिचं नेतृत्व करत असलेली नेतेमंडळी यांची एकजूट.- या लढ्यानेच प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे, दयानंद म्हस्के, कमलेश यादव आणि यांसारखे असंख्य असे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते दिले.- आंबेडकरी समाजाचा स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी आणि गुलामगिरी लाथाद्ण्याची वृत्ती यानिमित्ताने उभ्या महाराष्ट्राला पुन्हा एकवार दिसून आली.आता, हा लढा आणि २१ व्या शतकातील आंबेडकरी तरुण या नात्याने या विषयावर प्रकाश टाकूया.आधीच चर्चिल्याप्रमाणे आपण काय कमावले नि काय गमावले याचा ताळेबंद मांडला.यातून सहजपणे लक्षात येईल की, आंबेडकरी समाजाचा स्वाभिमान नि एकजूट सोडल्यास झाले ते जास्त नुकसानच झालेले आहे.९२५ स्त्रियांवर बलात्कार आणि २४० लोक जीवानिशी गेले हि काय छोटी आकडेवारी आहे ?तर नक्कीच नाही.या २४० मधील कित्येकजण तर वयाच्या २५ च्या आतील होते.म्हणजे आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांना आपला जीव गमवावा लागलाय.घरातील एखाद्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जसे संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते,तर इथे प्रश्न २४० कुटुंबाचाही आहे.रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांसारखे नेते या लढ्यातूनच मिळाले पण एकूण आंबेडकरी समाजासाठी त्यांचा फायदा किती झाला हा संशोधनाचा विषय ठरेल.समाजाला भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवून राजकीय फायदा घ्यायचा एवढाच उद्योग यानिमित्ताने दिसून आला.आंबेडकरी समाज भावनिक आहे,या असल्या मुद्द्यांने त्यांना काबूत ठेवता येते,असा समज इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा झाला आणि यातून त्यांनी कित्येकवेळा फायदाही घेतला.याच गोष्टींचा फायदा घेऊन ‘रिपब्लिकन पक्षा’ची फाटाफूट होत राहिली ते वेगळेच !!जाताजाता एवढेच सांगेन की , या भारताच्या म्हणजे एकूण राष्ट्र उभारणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचा वाटा किती आहे हे लिहायला घेतल्यास पुस्तकांचे खंड प्रकाशित होतील.त्यामुळे या संपूर्ण भारत देशाचे नामांतर ‘आंबेडकर’ केले तरीही ते उपकार फेडले जाणार नाहीत.म्हणून सर्व आंबेडकरी समाजाला एकच विनंती आहे की, केवळ ‘नामांतर’ हाच एवढा गहन प्रश्न आपल्यासमोर नाहीये,त्यामुळे प्रगल्भपणे विचार करून आता आपल्याला पुढील लढाईला सामोरे जायचे आहे.
जय भीम,जय भारत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत