महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

अशोक कांबळे यांच्या सारख्या थोर साहित्यिकाकडेदुर्लक्ष झाल्याने खंत वाटते. -ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार



मुंबई शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी:
स्मृतीशेष अशोक कांबळे यांसारख्या दर्जेदार ललित लेखन करणाऱ्या थोर साहित्यिकाकडे आमच्या पिढीचे दुर्लक्ष झाल्याने मनाला खंत वाटत असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी बोरीवली, मुंबई येथे बोलताना व्यक्त केली.
बोरीवली पूर्व येथील स्वागत हॉलमध्ये सद्धम्म साहित्य संघ आयोजित स्मृतीशेष अशोक कांबळे यांच्या ‘ ठिकरीची फोडणी ‘ या सकाळ प्रकाशन तर्फे प्रकाशित कथासंग्रहाचे प्रकाशन इंडियन एअर लाईन्सचे सेवानिवृत्त अधिकारी बाळ नांगरे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ज.वि. पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्धम्म साहित्य संघाचे अध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर हे होते.
ज. वि. पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, एकूणच सुरुवातीच्या दलित अथवा आजच्या आंबेडकरी साहित्यात काव्यप्रकार हाताळणाऱ्या कवीचं पीक उदंड आलं. स्वकथनेही खूप आली परंतु कथा, कादंबरी आदी ललित वाङमयप्रकार हाताळणारे साहित्यिक संख्येने अल्प आहेत. त्यापैकी स्मृतीशेष अशोक कांबळे हे एक होते किंबहुना श्रेष्ठ दर्जाच्या कथा लेखनात अपेक्षित असलेली सर्व वैशिष्ट्ये अशोक कांबळे यांच्या ‘ ठिकरीची फोडणी ‘ या कथा संग्रहात आढळतात.
प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्मृतीशेष अशोक कांबळे हे निःसंशय आंबेडकरी प्रेरणेचे साहित्यिक होते. तरीही त्यांच्या ‘ठिकरीची फोडणी ‘ या कथासंग्रहातील कथा कोणत्याही एका जात, धर्म, वर्ग, समूहाच्या मर्यादित परिघात व्यक्त न होता व्यापक समष्टीचं दर्शन घडवितात. खंत एकाच गोष्टीची वाटते की, संग्रह रुपाने आलेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा पाहण्यास लेखक अशोक चोखू कांबळे आज हयात नाहीत.
ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले, बाळ नांगरे, गझलकार भागवत बनसोडे, कवी सुनील ओवाळ, प्रा. गिरीश साळवे इत्यादींची या प्रसंगी समयोचित भाषणं झाली. या प्रकाशन सोहळ्यास सकाळ प्रकाशनचे प्रतिनिधी निस्सार अली हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. उत्तम भगत यांनी केले तर अनिता शरद कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.
याच कार्यक्रमात ज.वि पवार यांच्या साहित्यिक ज्येष्ठतेचा गौरव म्हणून प्रा. आनंद देवडेकर यांच्या संकल्पनेतून नव्याने साकारलेल्या जविकिरण काव्य मैफिलीत कवी सुनील ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यांजली’ हे निमंत्रितांचे कवी संमेलन रंगले.
प्रकाशन सोहळ्याची व्यवस्था शरद अशोक कांबळे व शेखर अशोक कांबळे यांनी केली होती

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!