भीमसैनिकाचे बलिदान,हजारो घराची राखरांगोळी,बलात्कार व नामविस्तार विजयश्री खेचनारा आंबेडकरी समाज अतुल्य होय!

लेखक- कुमार लोंढे मो.९८८१६४३६५०
नामांतर आंदोलन हे इतिहासातील अदभुत असे उदाहरण आहे. 27 जुलै 1978 रोजी सुरू झालेले आंदोलन 14 जानेवारी 1994 रोजी पूर्णत्वास आले म्हणजे सोळा वर्षाचे प्रदीर्घ असे आंदोलन हे महार समाजाच्या दलित समाजाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नापेक्षा अस्मिता, स्वाभिमान व मानव मुक्ती दात्या विषयी असलेली आस्था याचे जगाच्या इतिहासातील एकमेव व क्रांतिकारक असे अजब उदाहरण आहे असे म्हटले तर विपर्यास होत नाही. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देण्याबाबत घोषणा केली परंतु या घोषणेचे स्वागत होण्याच्या ऐवजी उच्चवर्णीय सवर्ण समुदायाने यास कडून विरोध केला व या निर्णयाचे स्वागत दलित, महार ,पुरोगामी या समुदायाने केले. जोगेंद्र कवाडे सर, बाळासाहेब आंबेडकर, गंगाधर गाडे,रामदास आठवले अरुण कांबळे, असे अनेक पॅंथर या आंदोलनामध्ये अग्रक्रमी होते. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथून लॉंग मार्च ची सुरुवात केली हा मार्च इतिहासातील जगाच्या सर्वात मोठा असा तिसऱ्या क्रमाचा मार्च ठरला. यामध्ये दलित पॅंथर, दलित संघटना, छोटे-छोटे संघटन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी व्यक्ती,कम्युनिस्ट तसेच दिल्ली, हरियाणा, बिहार मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक तामिळनाडू या राज्यातील हे प्रदर्शनकारी सामील झाले. थंडीच्या दिवसांमध्ये अठरा दिवसाचा प्रदीर्घ कालावधी व चारशे 70 किलोमीटर अंतराची आगेकूच करून तीन लाख लोकांचा हा मार्च लोकशाही मार्गाने नामांतर झालेच पाहिजे याकरता प्रदर्शन, जेलभरो, सामूहिक विरोध अशाप्रकारे आग्रही होता .हा मार्च इतिहासातील क्रांतिकारक ठरला.
नामविस्तार आंदोलनामध्ये अनेक दंगे,अत्याचार,गोळीबार, जाळपोळ ,बलात्कार ,दलित व विशेषता महार समाजास याची किंमत प्राणाची आहुती देऊन मोजावी लागली हे सत्य नाकारता येत नाही. दंगली मध्ये किमान बाराशे गावे, 25 हजार व्यक्ती , महार, दलित व्यक्तींना याचा प्रत्यक्षपणे त्रास सहन करावा लागला स्वतःला सवर्ण समजणारे उच्चवर्णीय व मराठा समाजाकडून हि असणारी पूर्वनियोजित केलेली अथवा आयोजित केलेली अशी दलितांची कोंडी होती.भूकमारी, उपासमार या कारणास्तव अनेक महार कुटुंबांना आपले गाव सोडायला भाग पाडले,हत्या करणे,घरे जाळणे, झोपड्या जाळणे , दलिताना गावाच्या बाहेर काढणे, पिण्याचे पाणी दूषित करणे, रोजगार देण्यास नकार देणे, त्यांच्या उदरनिर्वाहाची साधने उध्वस्त करणे, रस्ते पूल, दवाखाने ,बसेस ,सरकारी कार्यालय ,वाहतूक व दळणवळण यावर उच्चवर्णीय लोकांनी हमला केला. दलित लोकांना आर्थिक मानसिक दृष्ट्या विकलांग केले. आंदोलन कर्ते व दलित व्यक्तींना जखमी केले, त्यांच्या हत्या केल्या! पोलिसांच्या दमनकारी वृत्तीने पाच प्रदर्शनकारी समवेत 19 लोक शहीद झाले. काही घटनाक्रम पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि किती मोठे भयानक असे निंदनीय प्रकार घडले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सोनखेड गाव येथे उच्चवर्णीय समुदायाने महाराच्या घरांना आग लावून दोन महिलांवर बलात्कार व तीन मुलांची हत्या केली. सुगाव येथे जनार्दन मावळे यांची हत्या करण्यात आली. बोलसा इज्जतगाव येथे अनेक महिलांसोबत बलात्कार करण्यात आला. एका महिलेची स्तने कापण्यात आली. शहीद पोचीराम कांबळे यांचा मोठा मुलगा चंदर कांबळे याचा आंदोलक म्हणून जीव गेला. कोकले गाव येथे सामाजिक कार्यकर्ता व दलीत शिक्षकास त्याच्या पत्नीसह प्रतारीत करून दलित वस्त्या जाळण्यात आल्या.
परभणी जिल्ह्यामध्ये भीम नगर येथे हिंदू विद्यार्थी व युवक यांनी डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा तोडला. 17 जुलै 1978 ला परभणी शहरामध्ये बस रेल्वे अडवून फोन कनेक्शन कट करण्यात आले. पोलिसांचा हस्तक्षेप नव्हता व दलितांना टार्गेट केले. आडगाव येथे दलित लोकांना धमकावून त्यांच्या शेती उपकरणास आग लावली. कोरेगाव, कवडगाव ,नंदगाव , नंदापुर आणि परभणी सहित कित्येक गावात हिंसक घटना घडल्या. औरंगाबाद मध्ये उच्चवर्णीयांनी बसेस जाळल्या, पूल तोडले ,विध्वंस केला, प्रोफेसर मंडळींनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावास विरोध केला. एक मराठी विद्यार्थी यांनी नामांतराचे समर्थन केले तर त्यास उच्चवर्णीय लोकांनी बेदम मारहाण केली. अकोला येथील लिंगायत समाजाचे उच्चवर्णीय हिंदू महाजन राव पाटील यांनी दलितांना मदत केली म्हणून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आले .काशिनाथ बोरुडे नवबौद्ध पोलीस पाटील यांनी उच्चवर्णीयांची विरोधात केस केली म्हणून त्याची बैलगाडी घरचे सामान जाळण्यात आले. बीड जिल्ह्यात सुद्धा शरद पवार समर्थक वर हल्ला करण्यात आला. उस्मानाबाद मधील तुळजापूर मध्ये दलित महिलांवर हमले करून दलितांची घरे जाण्यास मदत केली. दळणवळणाचे सर्व रस्ते बंद करून महिलांना व दलितांना हलाल करण्यात आले.900 हिंसक उच्चवर्णीय युवक वर्गाने समूहाने दलितांवर हल्ला केला. विचारवंत हरी नरके एक प्रसंग व संभाषण नमूद करतात❝ नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे. ❞ नामांतर लढ्यातील शहीद हा मराठा जातीतील असलेला हा तरुण होय. विलास ढाणे। नावाप्रमाणेच खरा ढाण्या वाघ !! मूळचा सातारा जिल्ह्यातील विलास हा अतिशय संवेदनशील मनाचा युवक. नामंतरासाला मराठा जातीचा होत असलेला विरोध विलासला सहन झाला नाही. खिशात चिट्ठी लिहून विलासनी शिवाजी नगर पुणे येथील लोकल रेल्वेखाली आत्महत्या केली. हिंगोली येथे पीडित दलित व्यक्तीना तहसीलदार यांनी जेवण न देता भीक मागण्याचा सल्ला दिला. नाशिक येथे डॉक्टर आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
नागपूर येथे अविनाश डोंगरे या मुलाच्या डोक्यात गोळी लागली तो नामांतराच्या घोषणा देत होता. दिलीप रामटेके, अब्दुल सत्तर रोषण बोरकर, रतन मेढे इत्यादी नी नामांतराच्या लढाईत प्राणांची आहुती दिली. मीडिया निःपक्षपाती असतो परन्तु मीडिया सुद्धा पक्षपाती असतो हेच जाणवले.मीडियाने ग्रामीण भागातील हिंसा, अत्याचाराचा,बातम्या प्रकाशित केल्या नाहीत याउलट नामांतरास विरोध दर्शवला.एक प्रसिद्ध मराठी पेपर मात्र उच्चवर्गीय आंदोलकांच्या समर्थनार्थ पहिल्या पानावर नोटीस प्रकाशित करून आंदोलकांना म्हणजेच उच्चवर्णीयांना समर्थन करण्याचे आव्हान करत होते.
राजनीतिक पटलावरती हिंदुत्व राजनीतिक दल ,शिवसेना व बाळासाहेब ठाकरे समर्थक यांनी घरे जाळली ,तलवारीने हल्ले केले. प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की हमला करणारे मराठा समाजाचे तरुण होते. बलात्कार, हत्या,लहान मुलाची हत्या करून सुद्धा प्रशासनाने सदर उच्चवर्णीय यांचेवर कारवाई केली नाही असे गोपाल गुरु या व्यक्तीचे म्हणणे आहे. तसेच वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समर्थक समर्थक सुद्धा यामध्ये सामील होते. प्रशासकीय नोकर अनेक दलितांना पोलीस त्रास देत होते. कारण ते सवर्ण यांना मदत करण्यासाठी आग्रही होते. उच्चवर्णीय यांना पुरावा नष्ट करण्याच्या कामी पोलिस मदत करत होते .काही गावात सवर्ण पोलीस पाटील, सरपंच यांनी उच्चवर्णीय बरोबर मिळून दलित महार समुदायावर हमला करण्यास मदत केली. पोलीस हिंसा करण्यासाठी गर्दीत सामील झाले. नांदेड येथील कलेक्टर दलित होते. या दरम्यान त्यांच्या आदेशाचे पालन त्याच्या स्टाफ नी केले नाही .अकोला गाव मध्ये पोलिसांना उच्चवर्णीय विरोधात हिंसा केली अशी तक्रार घेतली नाही. या दंगलीमध्ये उपजिल्हाधिकारी गृह निरीक्षक इत्यादी अधिकाऱ्यांच्या मुलांनी भाग घेतला .दलितांच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. एक संसदीय समितीच्या अहवालानुसार अत्याचार ,हिंसा या दरम्यान पोलिस केवळ दर्शक होते.
सोळा वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर मराठवाडा विद्यापीठास 14 जानेवारी 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामविस्ताराचा ची घोषणा केली. आंदोलन सफल बनण्यासाठी अनेक लोकांचे जीव गेले याची सर्वात जास्त किंमत महार समुदायास मोजावी लागली म्हणून 14 जानेवारी हा दिवस दलित ,समाजवादी, पुरोगामी व डॉ.आंबेडकरांच्या विचाराचे पाईक, विशेषतः महार समुदायास विशेष स्फूर्ती देऊन चेतना निर्माण करणारा दिवस आहे. या दिवशी बा….. भिमाची लेकरे स्मरण करतात प्राणाहून प्रिय लोकशाहीच्या शिल्पकारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना व विद्यापीठ नामांतरातील शहिदांना नतमस्तक होतात.
भीमसैनिकाचे बलिदान,हजारो घराची राखरांगोळी,बलात्कार व नामविस्तार विजयश्री खेचनारा आंबेडकरी समाज हा खऱ्या अर्थाने अतुल्य असाच आहे त्याग,बलिदान,घरादाराची तमा न बाळगता,मनुवादी विचरसारणीस,प्रस्थापित व्यवस्थेस न जुमानता सर्व समाज ,सर्व यंत्रणा एकीकडे असताना उपाशी पोटी,बायका मुलांवरील नरसंहार पचवून लोकशाही मार्गाने चालणारा सतत ऊर्जा बाळगून आगेकूच करणारा आंबेडकरी समाज अतुल्य व अदभुत व विलक्षणीय होय.ही ऊर्जा अखंड प्रेरणास्रोत म्हणजे आपल्या मुक्तीदात्यांसी असलेली प्रामाणिकता व नवसंजीवनी, नवसमाज निर्मितीचे ध्येय होय. *डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो कौम अपना इतिहास भुलाती है*!
*वह कौम अपना इतिहास नही बनाती!*क्रांतिकारक जय भीम ! जय भारत!!14 जानेवारी 2023( पूर्ण वाचून नावासाहित शेअर करावा)@Copyright 2022
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत