लोकशाही रुजवण्याची, टिकवण्याची, वाढवण्याची जबाबदारी कुणाची?

तर साधं उत्तर आहे, लोकांची अर्थात आपल्या सगळ्यांची!
कुणीतरी अवतार, मसिहा, महामानव जन्मास येतो आणि तो सगळे बिकट प्रश्न सोडवतो, साधारणत: अशीच धर्मभोळ्या भारतीय समाजाची मानसिकता आहे. म्हणूनच लोकशाहीच्या ऱ्हासाला आपण एखाद्या व्यक्तीला, पक्षाला कारणीभूत ठरवतो आणि या ऱ्हासातून बाहेर पडायला, लोकशाही वाचवायला, रुजवायला, टिकवायलाही एखादा नेता, पक्ष यावर विसंबून राहतो. बदलाच्या प्रक्रियेत नेतृत्व महत्वाचे असतेच पण एका विचाराने, एका ध्येयाने एकवटलेला समाजच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतो. त्यात लोकशाही ही संकल्पना म्हणजे सत्तेच्या आणि संपत्तीच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना असल्याने तिला रुजवण्याची, टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी ही एखाद्या व्यक्तीवर अगर एखाद्या पक्ष-संघटनेवर टाकणे हेच मूळात या संकल्पनेच्या विसंगत आहे आणि असे करणे हेच या संकल्पनेस धोकादायकही आहे.
लोकशाही ही लोकांची असल्याने लोकांनीच ती समजून घ्यावी, रुजवावी, टिकवावी, वाढवावी.
कशी?, तर अशी –
(१) पहिल्यांदा आपण घरात, आपण जिथे एकत्रित काम करतो त्या ठिकाणी लोकशाही रुजवली पाहिजे. निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग, सर्वांच्या मताला आदर, सर्वांनी क्षमतेनुसार जबाबदाऱ्या वाटून घेण्याची सवय आणि सर्वांनी गरजेनुसार लाभ वाटून घेण्याची पद्धत अवलंबावी. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, पक्ष-संघटनेत लोकशाही नसेल तर आपण देशात लोकशाही आणूच शकत नाही.
(२) समाजातील घटनांबद्दल, राजकीय घटनांबद्दल, नेत्यांच्या वर्तनाबद्दल, सरकारच्या धोरणाबद्दल भीडभाड न ठेवता जाहीरपणे व्यक्त व्हायला हवे. अनेकांच्या व्यक्त होण्यातूनच सत्तेतल्यांवर वचक, दबाब राहत असतो. लोकांना काय पटते काय पटत नाही, काय चालते काय चालत नाही हे सत्तेतल्यांना लोकांच्या व्यक्त होण्यातूनच कळत असते. त्यामूळे व्यक्त होण्याला लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व आहे.
(३) धर्म अगर विधात्याची प्रार्थना करण्याची पद्धत ही अत्यंत खाजगी बाब असल्याने ती घराच्या उंबरठ्यात पाळावी. समाजात वावरताना भारतीयत्व हाच आपला धर्म आहे, याचे भान ठेवावे.
(४) कुणाही पक्षाचा, नेत्याचा अतिरेकी उदोउदो करु नये. नेत्यांकडे माणूस म्हणून बघावे. त्यांचा आदरही करावा आणि त्यांच्या चुका, उणीवा वेळोवेळी लक्षात आणून द्याव्यात. नेत्यांचे अतिरेकी अवडंबर माजवल्याने समाजात त्यांची निष्कारण दहशत निर्माण होते. लोकांना त्यांच्याशी संवाद साधायला मर्यादा निर्माण होतात. तसेच पैशाच्या बळावर एखाद्या नेत्याचे अवडंबर माजवले तर सर्वसाधारण कुटुंबातील गुणी नेतृत्व झाकले जावून त्यांना संधी देण्यावर बंधने येतात.
(५) नेत्यांकडून सार्वजनिक प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करावी. आपले व्यक्तिगत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा वेळ, पैसा खर्ची घालू नये. लोकप्रतिनिधींना लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, डोहाळजेवण, साखरपुडा, गृहप्रवेश अशा व्यक्तिगत कार्यक्रमांना बोलावून त्यांचा वेळ खावू नये. त्यांना लोकांचे प्रतिनिधीत्व करायचे असल्याने सार्वजनिक कामांसाठीच त्यांनी वेळ द्यावा यासाठी आग्रही रहावे.
(६) लोकशाहीकडे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जावून पहावे. राजकीय पक्षांची मक्तेदारी वाढणे, पक्षाच्या तिकिटाशिवाय कुणीही निवडून येवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होणे हे लोकशाहीसाठी घातक असते.
(७) भारतीय संविधान समजून घ्यावे. ते इतरांना समजावून सांगावे. चोखंदळ वाचक व्हावे. इतरांनाही वाचते, लिहिते, बोलते करावे.
(८) स्वत:च्या जीवनात प्रपंच, काम-धंदा-व्यवसाय, कुटुंब, मनोरंजन, कलासक्त व ज्ञानसक्त असणे, शरीरसौष्ठव, निर्भेळ आनंद देणाऱ्या गोष्टी करणे, खेळणे, माणसांत मिसळणे, विनोद करणे, हसणे-हसवणे अशा सर्व बाबींना महत्व देवून संतुलन साधावे. रोगट शरीराची, रोगट मनाची आणि कमकुवत बुद्धीची माणसं सशक्त समाज, सशक्त लोकशाही घडवू शकत नाहीत.
(९) महिला, लहान मुले-मुली, वृद्ध अशा सर्वांना मैत्रीपूर्ण वागणूक द्यावी. मैत्र्य, सख्य निर्माण करणारी माणसं आदर्श, संवेदनशील समाज निर्माण करु शकतात.
(१०) देशाचे अर्थकारण समजून घ्यावे. अर्थसाक्षर व्हावे, इतरांसही करावे. देशाची नैसर्गिक संसाधने व मनुष्यबळ सबंध देशवासीयांसाठी वापरले जावे यासाठी आग्रही रहावे. त्यावरील मुठभरांची मक्तेदारी अगर या संसाधनांची मुठभरांकडून होत असलेली लूट थांबवण्यासाठी कटीबद्ध असावे.
(११) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण पाळावा. जात, धर्म, लिंग, पंथ, वंश, भाषा यावरुन भेदभाव करु नये.
वरिलप्रमाणे लोकशाही रुजवण्यासाठीचा, टिकवण्यासाठीचा, वाढवण्यासाठीचा आपल्या प्रत्येकाचा आचार धर्म आहे. यात आपापल्यापरीने, आपापल्या बुद्धीने सुयोग्य भर घालून प्रत्येकाने याचे पालन केले तर आपण बदलाच्या प्रक्रियेकडे निश्चितच वाटचाल सुरु करु.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत