भगवान बुद्धांची शिकवण-भाग ७१

धर्म (Religion) आणि धम्म
धर्म (Religion) हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता.
वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारणभाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या दडपणाखाली तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी, त्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. त्यानंतरच्या धर्माच्या कल्पनेत ‘ईश्वरानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली’ अशी समजूत रूढ झाली. याच कल्पनेत माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या या जगातील कृत्यांबद्दल त्याला ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे अशीही पण समजूत रूढ झाली. धर्मविचाराचा विकास थोडक्यात याप्रमाणे झाला असे सांगता येईल.
ईश्वरावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी ईश्वराला प्रसन्न करणे म्हणजे धर्म अशी संकल्पना तयार झाली आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात.
मात्र धम्म हा धर्मापासून (Religion) वेगळा आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे.
असे म्हणतात की, धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्त्वतः तो सामाजिक आहे.
धम्म म्हणजे सदाचरण. म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसा-माणसातील व्यवहार उचित असणे.
यावरून स्पष्ट होते की, मनुष्य एकटाच असला, तर त्याला धम्माची आवश्यकता नाही. परंतु ज्या वेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात, तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका व्हावयाची नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही.
ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे.
प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म.
प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. (understanding). खुळ्या समजुतीला, अंधश्रद्धेला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्मात महत्त्वाचे स्थान दिले.
त्याचप्रमाणे करुणा… करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी करुणेला आपल्या धम्मात महत्त्वाचे स्थान दिले. ही झाली बुद्धांच्या धम्माची व्याख्या.
धर्माच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे! बुद्धांची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव, नाविन्यपूर्ण व मूळ संकल्पना आहे. धर्म आणि धम्म यांमध्ये असे अंतर आहे.
धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बुद्धांच्या सुनक्खत आणि पोट्ठपाद या ब्राम्हणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात.
तथागतांनी धम्माचा उद्देश, जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, दुःखाचा परिहार होऊ शकतो असा सांगितला. धर्म (Religion) ह्या कल्पनेत वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार (revealing the beginning of things) याला महत्त्व आहे, धम्माच्या कल्पनेत ते नाही.
धर्म आणि धम्म यांमधील इतर भेद तथागत आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत
पोठ्ठपद म्हणाला, “जग शाश्वत नाही काय? जग सान्त आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय ? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असेही नाही काय? या प्रत्येक प्रश्नाला तथागतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. ते म्हणजे, “मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. त्याचे कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही.
मी दुःख म्हणजे काय? दुःखाचे कारण काय? दु:खाचा निरोध म्हणजे काय? आणि दु:खाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगमार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते, म्हणूनच तर मी दुःख, दुःखकारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे.”
या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत्प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहेत.
नीति आणि धर्म (Religion)
खरे तर धर्मात नीतिला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे ईश्वर, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ/बळी हे होत.
एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतिला प्रारंभ होतो.
‘शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची एक बाब’ या कारणासाठी केवळ धर्मात नीतिचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा; कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे.
प्रत्येक धर्म नीति शिकवितो. परंतु नीति ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडला जातो किंवा त्यापासून सोडविला जातो. धर्माच्या व्यवहारात नीतिचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीति ही धर्मात महत्वाची ठरत नाही.
धम्म आणि नीति
धम्मात नीतिचे स्थान म्हणजे- नीति म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीति’ असे आहे. दुसऱ्या शब्दांत बोलायचे म्हणजे, धम्मात जरी ईश्वराला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतिने घेतलेले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ/बळी यांना स्थान नाही. नीति हे धम्माचे सार आहे. त्याशिवाय धम्म नाही. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे; या आवश्यकतेतूनच नीतिचा उगम होतो. त्यासाठी ईश्वराच्या आज्ञांची/मंजुरीची आवश्यकता नाही. ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे.
केवळ नीति पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो. सर्वांना होत नाही. थोड्या लोकांना समतेचा लाभ होतो. बहुसंख्यांकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी समाजात बंधुता (fraternity) असली पाहिजे. बंधुता म्हणजे मानवामानवातील भ्रातृभाव, जे नीतिचेच दुसरे नाव आहे. म्हणूनच बुद्धांनी शिकविले, “धम्म म्हणजे नीति आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतिही पवित्र आहे.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२२.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ चतुर्थ खंड भाग पहिला)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत