
वार्ताहर : शनिवार दि. २५ नोव्हें. २०२३
दादर मुंबई आज येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली धम्मसंस्था भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या केंद्रीय शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांसाठीचा “हिशोबाची कार्यशाळा” हा आर्थिक अहवाला संबंधिचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आंबेडकर भवन येथे घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एड. भीमराव यशवंतराव आंबेडकर यां च्या परवानगीने करण्यात आले.
तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भंते सुमेध बोधी, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय ऑडिट कमिटी प्रमुख आद. एस के भंडारे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष आद. सुषमाताई पवार, आयु. बी. एच गायकवाड सर, तसेच ऑडिट कमिटी उपाध्यक्ष एस एस वानखेडे सर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आयु. सुशील वाघमारे सर, मुंबई शहर अध्यक्ष आयु. उत्तम मगरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर तसेच महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी जशी भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या हिशोबाची ठेवण सांगितलेली आहे की “धम्म संस्थेचा आर्थिक व्यवहार हा आरशाप्रमाणे स्वच्छ असावा” या उद्देशाप्रति सूत्रबद्ध पद्धतीने लेखा जोखा असावा हे एकमताने स्वीकारण्यात आले आणि या उद्देश पूर्तीसाठी पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे याचे सविस्तर मार्गदर्शन दोन सत्रात करण्यात आले.
धम्माचा रथ पुढे नेण्याचे जबाबदारीचे काम करत असताना आर्थिक बाजू ही तितक्याच जबाबदारीने हाताळली पाहिजे. हिशोबामध्ये अधिक स्पष्टता राहावी व्यवस्थितपणा यावा यासाठीची ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची होती. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या आधारावर या कार्यशाळेमध्ये अनेक विषय चर्चिले गेले तसेच संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांबाबत काम करत असताना संस्थेचा आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक पदाधिकाऱ्यांवरती आहे असे स्पष्ट करण्यात आले. .
यावेळी महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी पूनर्गठीत करण्यात आली व अध्यक्ष पदी आयु. भिकाजी कांबळे सर यांची तर सरचिटणीस पदी आयु. सुशील वाघमारे सर यांची निवड कायम ठेवण्यात आली.
कार्यक्रमाला वरिष्ठ केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शाखेचे सर्व पदाधिकारी, मुंबई शहरासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय आवश्यक असे हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने केंद्रीय शाखेचे सविनय आभार मानण्यात आले.
पूज्य भंते सुमेध बोधी यांच्या आशीर्वाद गाथेने व सरणते गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत