शेतकरी कष्टकरी आणि बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन. या निमित्ताने बाबासाहेबांचे स्मरण करत असताना त्यांनी केलेल्या चौफेर कार्याची प्रकर्षाने आठवण, स्मरण होते. त्यांच्या अफाट क्षमतेने निर्माण केलेल्या अनेक बाबींचा भारतीय समाजाच्या उत्थानासाठी कमालीचा फायदा झाला आणि आजच्याही संदर्भात त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जसे विख्यात आहे तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेने त्यांनी गाठलेली शिक्षणाची विविध शिखरे त्यांना जागतिक कीर्तीच्या उंचीवर घेऊन जातात. प्रचंड बुद्धीमत्ता,दुर्दम्य आत्मविश्वास, चिकाटी,जिद्द आणि सचोटी या सद्गुणांचा तेजःपुंज त्यांच्या विद्वत्तेला लख्ख करुन समाजाभिमुख करत असल्यामुळेही ते आधुनिकतेचे अद्वितीय प्रतिनिधी
अभ्यासू वृत्तीने ज्ञानाची विविध शिखरे सर करणारे,अथक अध्ययनाची अविट गोडी असणारे त्यांच्या सारखे तेच अद्वितीय ज्ञानार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान,नितीशास्त्र,धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजनीती इत्यादी अनेक विषयांचा व्यासंगी अभ्यास करून डॉ बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयातीत मानवाच्या कल्याणाचा विचार समाजात रुजविला. अस्पृश्य समाजाच्या निकराच्या चळवळीसोबतच महिलांच्या प्रश्नांवर बाबासाहेबांनी गंभीरपणे चिंतन मांडले. लोकसंख्येच्या सुमारे निम्मा हिस्सा असलेले वनिता विश्व अज्ञानामुळे, अत्याचारामुळे अंधश्रद्धा व धर्मांधतेच्या खोल दरीत किती केविलवाण्या अवस्थेत खितपत पडले आहेत, हे बाबासाहेबांनी नेमकेपणाने ताडले. त्यासाठी महिलांच्या क्रांतीचे सूत्र आपल्या वाणीतून व लेखणीतून वारंवार मांडले. या देशातील पोशिंदा शेतकरी-श्रमजीवी जनसमुदाय अहोरात्र कष्ट उपसूनही धर्मांध शक्ती, भांडवली व्यवस्था, परोहितशाही आणि सावकारशाही यांच्या पिळवणुकीचा कसा बळी पडतो ते तपासून पाहिले.त्याचे भले झाल्याशिवाय देशाचे भले होऊ शकत नाही, ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ अशी भूमिका घेऊन बाबासाहेबांनी या समाजासाठी केलेले काम हे खऱ्या अर्थाने देशोद्धाराचे महनीय कार्य होय. त्यांनी शेतीसुधारणा, जमिनधारणा कायदे, सिंचन,नदीजोड प्रकल्प,नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचे आधुनिकिकरण इ.संदर्भात अतिशय संवेदनशील सकारात्मक दिशादर्शक चिंतन मांडले. डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. मेघनाद साहा यांच्यासोबतच्या समन्वयातून भारतीय कृषिक्रांतीचा पाया त्यावेळीच रचला गेला. कामगार मजूर यांच्या वेतनाचे प्रश्न, मजुरीचे प्रश्न, कामाचे तास, कामगारांना विश्रांती साठी सुट्टी असे प्रश्न यासंबंधी बाबासाहेबांनी भारताचे केंद्रीय मंत्री असताना यासंदर्भातील कायदे करण्यासाठी आणि समाजाला श्रमिकांचे श्रममूल्य समजावून सांगण्यासाठी शर्थीने प्रयत्न केलेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे संविधान तयार होत असताना, या देशातील सर्व नागरिकांना मतदानाचा समान हक्क, ‘एक मत एक पत'(प्रतिष्ठा) अशा पद्धतीची लोकशाहीमूल्ये समाविष्ट केली. जात, लिंग, प्रदेश इ. प्रकारची विषमता दूर करण्यासाठी समानतेचे तत्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून पक्के करत असताना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सूत्रांच्या अनुषंगाने अनेक कलमं घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यासोबतच भारतीय समाजाची जातीव्यवस्थाधिष्टित विभागणी, जातीगत उच्च कनिष्ठ भेदभाव व शोषण आणि ढोंगी धर्मग्रंथांची परखड धर्मचिकित्सा करून समतावादी लढ्याला अनेक आयाम प्राप्त करून दिले. जात उंतरंडीने पुष्ठ बलिष्ठ झालेल्या अनिष्ट ब्राम्हणी परंपरांनी प्रताडित,मानवी हक्कांपासून, सामाजिक न्यायापासून, शिक्षणापासून, रोजगारापासून अन् उच्च प्रतीच्या जीवननिर्वहनापासून वंचित असलेल्या समस्त महिलांचा शेतकरी कष्टकरी समाजाचा उत्कर्ष करण्याचे ध्येय गाठण्याचे दिशादर्शन केले. सामाजिक न्यायाचे निलचित्र मजूर पक्षाच्या ध्येयधोरणातून प्रसारित केले. हे करत असतानाच या देशाची मानवतावादी, न्याय्य उदात्त परंपरा व विषमतावादाला तिलांजली देऊन माणुसकीची शिकवण देणारे समाजसुधारक संतपुरुष आणि विविध धर्मसुधारणावादी प्रवाह यांचा सुंदर मिलाफ ते करतात. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक भारताचे खरे राष्ट्रनिर्माण कर्ते ठरतात. महात्मा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध यांना गुरुस्थानी मानून हजारो वर्षाची प्रबोधनाची परंपरा आधुनिक पिढीला त्यांनी ध्यानात आणून दिली. बुद्ध कबीर फुले ही व्यक्तींची नामावली नव्हे तर, या देशातील सिंधुजनांचा अवैदिक सांस्कृतिक लढा भक्कम पायावर उभा करणारी विचारधारा होय. समतेच्या समरांगणात आत्मसन्मानाने लढणाऱ्या अनार्य, नागवंशीय, द्रविड,शुद्रातीशुद्र, बहुजन म्हणजेच ओबीसी भटके दलित आदिवासी अल्पसंख्याक यांच्या अस्मितेचा, सामाजिक न्यायाचा संग्राम ज्वलंत ठेवणारा वैचारिक बारुदखाना होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा वैचारिक वारसा अधिक टवटवीत करुन येथील भूमिपुत्रांच्या सुपुर्द करतात. म्हणून आज समाज सर्व क्षेत्रामध्ये देदीप्यमान प्रगती करत असताना बाबासाहेबांच्या कार्याने आणि कर्तृत्वाने या देशाची मान उंच उंच होत जाते.
अशा या महामानवाला विनम्रपणे अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…
■ अनुज हुलके
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत