धर्म स्वातंत्र्य नाकारणारा धर्म स्वातंत्र्य कायदा?

वास्तविक पाहता मुस्लिम, ख्रिश्चन या धर्माला डोळ्यासमोर ठेवून हा कायदा करण्यात आला आहे. या दोन्ही धर्माचे भारतातून उच्चाटन करणे हे संघाचे फार जुने स्वप्न होते. संघाचे बायबल मानले जात असलेल्या मा. स. गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट’ हे वाचल्यानंतर सहज लक्षात येते की या ग्रंथात हिंदू राष्ट्राची कल्पना मांडताना ख्रिश्चन व मुसलमान हे हिंदू राष्ट्रासाठी धोकेदायक आहेत असे नमूद केले आहे. त्यामुळे भाजप संघ परिवारात धर्मनिरपेक्षता सर्वधर्मसमभाव या शब्दाची ऍलर्जी आहे समता तत्वाची भीती आहे त्यातूनच हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. परंतु असा कायदा आणणारे महाराष्ट्र हे पहिले किंवा एकमेव राज्य नाही तर असा कायदा आणणारे पहिले राज्य ओरिसा आहे. तेथे हा कायदा 1967 मध्ये लागू झाला. त्यानंतर 1968 मध्ये मध्य प्रदेश, 1978 मध्ये अरुणाचल प्रदेश, 2003 मध्ये गुजरात, 2006 मध्ये छत्तीसगड, 2018उत्तराखंड, 2019 हिमाचल प्रदेश, 2020 उत्तर प्रदेश, 2021 कर्नाटक व त्यानंतर 2026 मध्ये महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लागू झालेल्या या कायद्याचे समर्थन करताना असे म्हटले आहे की, बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे आणि आमिष दाखवून, जबरदस्ती करून, फसवणूक करून बळजबरीने, दिशाभूल करून, धमकी देऊन, गैरवाजवी प्रभाव टाकून, लबाडीचा मार्ग दाखवून, बुद्धिभेद करून इत्यादी मार्गाचा अवलंब करून एखाद्या व्यक्तीचे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात होणाऱ्या धर्मांतराला बेकायदेशीर धर्मांतर असे या कायद्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद केली आहे तसेच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून भाजपा सह संघ परिवार दक्ष आहे.
एकंदरीत या कायद्याचे स्वरूप लक्षात घेतल्यास थोडक्यात असे म्हणता येईल की, भारतात आजवर जी धर्मांतरे झाली ती आमिष दाखवून, बळजबरीने, धमकी देऊन, दिशाभूल करून लबाडीचा मार्ग दाखवून झाली आहेत व आता अशी धर्मांतरे होऊ नयेत ही या कायद्यामागील भूमिका आहे. परंतु आतापर्यंत जी धर्मांतरी झाली ती या कारणानेच झाली असे म्हणता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी केलेल्या धर्मांतर या कायद्याच्या कोणत्या तत्त्वात बसणारे आहे. परंतु याचा विचार शासनाने गांभीर्याने केलेला दिसून येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 येवले येथे धर्मांतराची घोषणा करताना त्यांनी आपल्या धर्मांतराची भूमिका मांडताना स्पष्ट म्हटले होते,”हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला डागच आम्हाला आमच्या प्रगतीच्या आड येत आहे. आमच्या साऱ्या मानहानीचे सवर्ण हिंदूंच्या आमच्या बाबतीतील तूच्छतापर वर्तन आहे आणि असेच जर असेल तर या धर्माचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे?” त्याचप्रमाणे त्यांनी हिंदू संवर्ण हिंदू उद्देशून दोन मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते.
1) अस्पृश्यांना हिंदू धर्मात अस्पृश्याविषयी समानतेची सन्मानाची भावना आहे का?
2) हिंदू धर्मात अस्पृश्यांना इतर सवर्ण हिंदू प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य आहे का?
3) अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश आहे का?
1935 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेली भूमिका व त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न यांचा विचार तत्कालीन हिंदूंनी केला नाही आणि आजही हिंदू यावर आत्मचिंतन करायला कितपत तयार होतील? हा मूलभूत विचार हा कायदा बनवताना झाला नाही हे स्पष्ट दिसून येते.
त्या वेळच्या हिंदूंनी बाबासाहेबांची धर्मांतर संबंधीची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न तर केलाच नाही पण “धर्मांतर म्हणजे देशद्रोह” मानून डॉ. आंबेडकरांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले. हे पत्र 3 नोव्हेंबर 1935 ‘विविधवृत्त’ या वृत्तपत्रात छापून आले होते. याप्रसंगी विविधवृत्तचे संपादकच आंबेडकरांना बातमी दाखवत म्हणाले होते, “बाबासाहेब तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे पण तुम्हाला मारण्याएवढे हिंदू मध्ये धाडस साहस निश्चितच नाही, जर असते तर त्याने तुम्हाला मारण्याऐवजी हिंदू धर्म सुधारण्याची चळवळ हाती घेतली असती, सनातण्यांचा विरोध पत्करून त्यांच्या विरुद्ध लढा दिला असता” या अनुषंगाने हिंदू राष्ट्राची स्वप्न बाळगणाऱ्या सरकारला सांगावेसे वाटते हिंदू धर्माची तुम्हाला खरंच काळजी असती, तर असे कायदे करण्यापेक्षा हिंदू धर्मात, हिंदू मानसिकतेत सुधारणा घडवून आणता आली असती. यासंदर्भात कायदा करणे म्हणजे “रोग रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला” असे आहे. संविधानात अस्पृश्यता निवारणेचा कायदा केला पण ती आजही जिवंत आहे आणि अस्पृश्यता व त्यातून येणारी भेदभावाची कल्पना हे खरे हिंदू धर्मातून होत असलेल्या धर्मांतराचे कारण आहे आणि ही अस्पृश्यतेची भावना संपूर्ण देशात पसरलेली आहे आणि अस्पृश्यतेला, अस्पृश्यतेमुळे मिळणाऱ्या वागणुकीला छळाला कंटाळून या देशात विशेषतः स्वातंत्र्यानंतर बहुतांशी धर्मांतरे झाली आहेत. त्यांची अनेक उदाहरणे सांगता येतील दक्षिणेतील अस्पृश्य महिलेला कमरेच्या वर वस्त्र घालण्यास बंदी होती तरी एका महिलेने कमरेच्या वर वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची भर रस्त्यात वस्त्र फाडण्यात आली आणि आपली इज्जत झाकण्यासाठी पहिली स्त्री ख्रिश्चन झालेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर मोठी सामूहिक धर्मांतरे घडून आली. कशासाठी? अमिषातून, जबरदस्तीतून हे धर्मांतर झाले होते का?
स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या धर्मातारनंतर देशात खळबळ उडवून देणारे धर्मांतर म्हणजे अस्पृश्यांनी सामूहिकरित्या स्वीकारलेला मुस्लिम धर्म. 19 फेब्रुवारी 1981 रोजी तामिळनाडूतील तिरूनवेली जिल्ह्यापासून 15किलोमीटर अंतरावर असलेल्या मीनाक्षीपुरम गावातील 143 कुटुंबातील 600 दलितांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. हे धर्मांतर अमिषामुळे किंवा जबरदस्तीने झालेले नव्हते. तरी यामध्ये परक्यांचा हात आहे, असे म्हणत पहिल्यांदा या धर्मांतराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण ज्यावेळी या धर्मांतराचे खरे कारण शोधले तेव्हा लक्षात आले की या गावातील ‘घेवर’नावाच्या सवर्ण जातीच्या जाचाला कंटाळून त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. तेव्हा हिंदू महासभा जागी झाली. त्यांनी त्या परिसरात ‘हिंदू जागरण अभियान’ राबवले त्यात ‘हिंदू सारे एक’ अशा बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या पण तेथील दलितांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून प्रयत्न केले नाहीत.
त्यानंतर 1981 मध्ये ही चर्मकार समाजाला सवर्ण हिंदू कडून मिळणारी वागणुकीचा निषेध म्हणून तत्कालीन मंत्री जगजीवन राम यांनीही “आपण मुसलमान धर्म स्वीकारणार” अशी आपल्या फोटोसह मोठी पत्रक काढली होती याचा सविस्तर वृत्तांत निखिल वागळे यांनी तत्कालीन साप्ताहिक दिनांक मध्ये दिलेला होता.
आजही दलितावर होणारे अत्याचार त्यांना मिळणारी भेदभावाची वागणूक थांबली नाही. आजही त्यांना मंदिरात गेल्यास मारहाण केली जाते, त्यांची स्मशानभूमी वेगळी आहे. गुजरात मध्ये आजही दलित नवरदेव घोड्यावर बसणे, दलितांनी मिशा वाढवणे, गरबा खेळणे गुन्हा मानला जातो. मराठवाड्यातील सात जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल आहेत, गुजरात मधील गोलारहट्टी या गावात खासदार असूनही नारायण स्वामी यांना सवर्ण वस्तीत प्रवेश दिला गेला नाही, 8 ऑगस्ट 2026 रोजी कॉँग्रेस अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची रामलीला मैदानावर सभा झाली. ज्या ठिकाणी ही सभा झाली ते ठिकाण गोमूत्रांनी स्वच्छ करण्याचे काम गिरीश पांडे यांनी केले. विदर्भात सवर्ण मुलीशी प्रेम केले म्हणून नथुभाई गवई आणि त्यांचा भाऊ बब्रुवाहन गवई यांचे डोळे काढले गेले. अशी असंख्य उदाहरणं सांगता येणारी आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर या देशातील सूर्य दलितांची विटंबना पाहिल्याशिवाय उगवत नाही किंवा दलितांची विटंबना पाहिल्याशिवाय मावळत नाही. अशा प्रकारचे जीवन जगणारी माणसं धर्मांतर करणार नाही तर काय करतील?
दलितांच्या वाट्याला आलेल्या वास्तवाचा विचार होऊन या धर्म व्यवस्थेत बदल होणार आहे की नाही? त्यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे की नाही? आणि हे काम हाती न घेता असे कायदे करणे म्हणजे हिंदू धर्मात बदल घडवून आणण्यास आम्ही असमर्थ आहोत किंवा विषमतावादी व्यवस्था बदलण्याची आमची इच्छा नाही आम्हाला समता नाही समरसता आणायची आहे अशी कबुली देणारा हा कायदा आहे.
परंतु या कायद्यामुळे देशात धर्मांतरे होणार नाही अशा भ्रमात सरकारने राहू नये कारण अन्याय अत्याचार सहन करण्यालाही एक मर्यादा असते. ही मर्यादा संपली तर येथील दलित कोणतीही किंमत देऊन धर्मांतराला सिद्ध होईल व आपल्या कायद्यात बसेल याची काळजी घेऊन या धर्मात लाचाराचे जिना जगण्यापेक्षा तो बौद्ध, ख्रिश्चन वेळप्रसंगी मुसलमान ही होईल पण या धर्मात गुदमरून मरणार नाही आणि ही धर्मांतर सरकारला रोखायची असतील तर सवर्ण हिंदूंची मन दुखावतील याचा विचार करण्यापेक्षा हिंदू धर्म जगला पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे तरच हिंदू धर्म वाचवण्यासाठी केलेला धर्म स्वातंत्र्य नाकारणारा धर्म स्वातंत्र्य कायदा महत्त्वाचा ठरेल.
डॉ. सुरेश वाघमारे
लातूर
मो. 94030 60555
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



