सम्यक समाज संघाच्या पुढाकाराने लातूरमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र.

लातूर : सम्यक समाज संघाच्या पुढाकाराने लातूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सम्यक समाज संघाची व्यापक बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत उपस्थित सदस्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक समाज संघाचे अध्यक्ष ॲड. मंचकराव डोणे उपस्थित होते. तसेच विचारपीठावर डॉ. नारायण कांबळे आणि माजी वनाधिकारी जी. एस. साबळे यांची उपस्थिती होती.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची वास्तव आणि ऐतिहासिक माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या समाजहितैषी व लोककल्याणकारी कार्याचा अभ्यास करण्यासाठी नव्या पिढीला प्रेरित करणे आणि त्यांच्या कार्यावर संशोधनाला चालना देणे, हा अध्यासन केंद्रामागील प्रमुख उद्देश आहे. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन व कार्यावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद तसेच विविध शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अध्यासन केंद्राचे उद्घाटन लवकरच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण महाराज होळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, याच बैठकीत लातूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कायमस्वरूपी व्याख्यानमाला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण, परिवर्तन, पुरोगामी विचार आणि लोककल्याणाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सम्यक समाज संघाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना एकत्र आणणारे हे विचारपीठ असून, बैठकीस शिक्षण, सामाजिक, प्रशासकीय, राजकीय, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. लातूरमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व्यापक अभ्यास आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने अध्यासन केंद्राची स्थापना ही महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यावेळी उपस्थित श्री. बाळकृष्ण धायगुडे, प्रा. लहुकांत शेवाळे. प्रा. मोहन भंडे, श्रीमंत वाघमारे, प्रा. डॉ. हनुमंत वाघलगावे, प्रा. रवींद्र सोनवणे, श्री अरुण तलवार, श्री. विजय जागले, प्रा. डॉ. शिवाजी गाढे, श्री. शीलरत्न सूर्यवंशी, प्रा. डॉ. राहुल डोंबे, श्री. सोनेराव माने इ. मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले व श्री रवींद्र सोनवणे यांनी आभार
व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


