भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

दहा पारमिता भाग ४०

मागील भागात दहा पारमितांपैकी शील व दान या दोन गुणांची माहिती घेतली. आता त्यापुढील गुणांची माहिती घेऊया.
३) उपेक्षा
उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्‍ती, आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिती होय. फल प्राप्तीने विचलित न होणे; परंतु सतत प्रयत्‍न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. नि:स्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे. वैयक्‍तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्‍नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक आहे. उपेक्षा म्हणजे उदासीनता नव्हे.
एकदा भगवान बुध्दांना विचारण्यात आले होते की, मानवाचे कल्याण कश्यात आहे? तेव्हा त्यांनी अकरा प्रकारचे कल्याण (मंगल) सांगितले आहे. त्याला महामंगल सुत्त म्हणतात. त्यापैकी अकरावे कल्याण लोकस्वभावाला धरुन सांगितले आहे. हे सुत्त उपेक्षेच्या दृष्टीने एक उदाहरण असून अत्यंत महत्वाचे आहे.
फुट्ठ्स्स लोकधम्मेही, चितं एस्सं न कंपत्ती।
अशोकं विरजं खेमं, एतं मंगल मुत्तमं॥

याचा अर्थ म्हणजे लोकस्वभावासंबंधीचे लाभ आणि हानी (Gain and loss), किर्ती आणि अपकिर्ती (Fame and defame) काही ठिकाणी किर्ती आणि अपकिर्तीच्या ऎवजी यश आणि अपयश ((Success and unsuccessful) असा उल्लेख केला आहे. स्तुती आणि निंदा (Praise and blame), सुख आणि दु:ख (Happiness and pain) असे जीवनात प्रसंग आल्यानंतर आपले चित्त थोडेही विचलीत होऊ न देणे, शोक न करता चित्त शांत व निर्मळ ठेवणे हेच उत्तम मंगल आहे.
लाभ आणि हानी ही लोकस्वभावाची पहिली जोडी आहे. एखादा व्यक्ती लाभ झाला की आनंदीत होतो व हानी झाली की दु:खी होतो. अशावेळी शांत राहून लोकस्वभावाच्या आहारी जाऊ नये. त्यावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
बुध्दाच्या वेळची एक गोष्ट आहे. एक स्त्री भन्ते सारीपुत्त आणि त्यांच्यासोबत आलेल्या भिक्खूंना भोजणदान देत असताना तिला एक निरोप येते की, तिचा पती आणि मुलगा एका अपघातात मारल्या गेले आहेत. तरीही तिने जेवण वाढण्याचे काम न थांबविता भिक्खूंचे पूर्ण जेवण हो‍ऊ दिले. तसेच तिच्या नोकराणीकडून तूप वाढत असतांना तिच्या हातून ते भांडे खाली पडून फुटले. त्यामुळे ती दु:खी झाली होती. भन्ते सारीपुत्तानी तिची समजूत घालून सर्व फुटणार्‍या वस्तू फुटणारच… त्यामुळे वृथा शोक करु नको असे सांगितले. (All breakable things are bound to break) जेव्हा त्या स्त्रीचा पती आणि मुलगा मरण पावले आहेत, तरीही तिने जेवण वाढण्याचे काम न थांबविता भिक्खूंचे पूर्ण जेवण हो‍ऊ दिले. हे भन्ते सारीपुत्तांना कळताच त्यांनी तिच्याबाबतीत गौरवाचे उदगार काढून म्हटले की, “ या धेर्यवान स्त्रीचा हा एक महान पराक्रम असून ती या स्तुतीस पात्र आहे.” (Such values on the part of courageous women is highly commendable.)
किर्ती आणि अपकिर्ती ही लोकस्वभावाची दुसरी जोडी आहे. किर्ती होते तेव्हा आपणास आवडते. पण बदनामी मात्र आवडत नाही. आपण सतत किर्तीमान होत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अपकिर्ती झाली की लगेच खचून जातो. आपल्या हातून जोपर्यंत चांगले कार्य घडत असते तोपर्यंत लोक मान-सन्मान देतात. परंतु जर का आपल्या हातून एखादी चूक झाली की तेवढ्याच मोठ्या प्रंमाणात बदनामी करतात. अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
स्तुती आणि निंदा ही लोकस्वभावाची तिसरी जोडी आहे. थोड्याशा स्तुतीने आपण स्वत:ला फार मोठे समजायला लागतो आणि निंदेने मात्र हिरमुसले होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येथील सनातन्यांनी खूप निंदा केली. तरीही ते न डगमगता आपल्या हातचे कार्य सोडले नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना लिहून सादर केली; तेव्हा त्यांचेवर स्तुतीसुमने उधळल्या गेलेत. त्यामुळे स्तुतीने ते वेडेपिसे झाले नाहीत. भगवान बुध्दांने सांगितलेल्या लोकस्वभावाला ध्येर्याने सामोरे जाणारे ते महापुरुष होते. शंभर टक्के कोणीही चांगले अथवा वाईट असू शकत नाही. जेथे स्तुती आहे तेथे निंदाही असू शकते. निंदेचा प्रसंग आला असताना सहनशिलता व संयम कायम ठेवणेच योग्य असते. निंदेमुळे मनस्थिती जर बिघडवून घेतली तर तो तेथेच थांबून जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे हातून घडणारे कुटुंबाप्रती व समाजाप्रती पुढील चांगल्या कार्याला तेथेच खिळ बसण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत असते. म्हणून अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
सुख आणि दु:ख ही लोकस्वभावाची चवथी जोडी आहे. आपण रोज जे कर्म करतो ते सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी धडपडत असतो. संपत्ती, पैसा, पद, सौंदर्य, सत्ता, लग्न, कुटुंब, गाडी, बंगला इत्यादी आपल्या सुखाच्या कल्पना असतात. याची प्राप्ती झाली की जीवनात सर्व सुखे मिळालीत असे वाटते. सर्व भौतिक बाबी सुखाचे साधने आहेत. ते साध्य नाहीत. म्हणून सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. हीच शिकवण भगवान बुध्दानी महामंगल सुत्तामध्ये दिली आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२२.१.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!