छत्रपती शिवाजी महाराज यांची समतेची शिवशाही:

प्रा.(डॉ.)छाया स.मित्तर,
माजी प्राचार्या.
मोबाईल:9773415469
हा लेख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुयायांना समर्पित.
या लेखनाचा हेतू कोणताही धर्म किंवा व्यक्तिगत भावना दुखावण्याचा नाही.खालील संदर्भ वापरून लेख लिहिला आहे.
संदर्भ:*महात्मा फुले समग्र वाङ्ममय महाराष्ट्र शासन,मुंबई.
*कॉ.गोविंद पानसरे लिखित,’शिवाजी कोण होता?’
*शिवश्री श्रीमंत कोकाटे लिखित, ‘शिवरायांचे खरे शत्रू कोण?’ (मराठी ई पुस्तक)
*ब.मो.पुरंदरे लिखित, ‘राजा शिवछत्रपती’
आज 19 फेब्रुवारी 2024.आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती.या निम्मित त्यांना कोटी कोटी अभिवादन.
19 फेब्रुवार 1630 रोजी महाराष्ट्रातील पुणे, जिल्यातील शिवनेरी किल्ल्यावर मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा शिवजयंती म्हणून देशभर सुपरिचित आहे.
(छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेबद्दल: एक तारीख 19 फेब्रुवारी 1630.म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 शुक्ल संवत्सर. दुसरी जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितीया शके1549 मानली जाते.इंग्रजी कॅलेंडर 6 एप्रिल 1627).
शासनाने 19 फेब्रुवारी 1630 निर्धारित करून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ।।
लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कुणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
….महात्मा फुले यांच्या पोवाड्यातील ही पहिली ओळ !!
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा विषय आहेत.शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान!
1869 साली सर्वात प्रथम माळी समाजातील महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली.म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर साधारण पावणेदोनशे वर्षानंतर.एवढ्या मोठ्या कालखंडात ते समाधी स्थळ महाराष्ट्रासाठी अपरिचित आणि अज्ञात होते. त्या काळातील कोणत्याही महाराष्ट्रातील शासक किंवा इतिहासकार यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही हे स्पष्ट होते.लगेचच 1870 साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती” साजरी केली.त्यांच्या संपूर्ण जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था ब्रिटिश राजवटीतील सरकारने स्वतःकडे घ्यावी, असा अर्ज ज्योतिबांनी केला होता. नंतर जवळ जवळ पंधरा वर्षांनी अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक कारणांसाठी शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली.
रवींद्रनाथ टागोर यांनीही त्याकाळी ‘शिवाजी उत्सव’ नावाची कविता लिहून शिवाजी महाराजांची स्तुती केली. त्यांच्या त्या कवितेत ते म्हणतात – ‘हे शिवाजीराजा हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मूक राहिली. पण तुम्ही दिलेला स्वातंत्र्यप्रेरकतेचा मंत्र कायम आमच्या मनात तेवत राहील’.
जे समतेचे कार्य बुद्धांनी सुरू केले.तेच कार्य पुढे सम्राट असोक आणि त्यानंतरच्या सर्व बौद्ध सम्राटांना ते पुढे घेऊन जाता आले.ते पुढे नव्याने भारतीय समाजात रुजविण्याचे काम शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र भूमीत केले.
निडरता,वीरता,शूरता, पराक्रम,संघर्ष,आणि प्रामाणिकता याच बरोबर स्वराज्याला मानवी नीती मूल्याची जाणीव करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे तथागत गोतम बुद्ध (गौतम हा शब्द पालि भाषेत ‘गोतम’ असा लिहिला जातो), बौद्ध सम्राट,असोक (अशोक हा शब्द पालि भाषेत ‘असोक’ असा लिहिला जातो),बौद्ध सम्राट कनिष्क यांची आठवण करून देतात.
शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही.तर ते सुराज्य आणि सर्वसमावेशक कल्याणकारी स्वराज्य देखील होते.कारण या स्वराज्यात स्त्री सन्मान,समता, बंधुता,न्याय,आणि शेतकरी हित जोपासणारी स्वतंत्र व्यवस्था त्यांनी निर्माण केली.म्हणूनच त्यांना रयेतेचा राजा म्हणतात.
बारा बलुतेदार,अठरा पगड जाती,मुस्लिम आणि तथाकथित वर्ण व्यवस्थेत अगदी खालच्या आणि हलक्या समजल्या जाणाऱ्या जातींना एकत्र करून शक्तिशाली घोडदळ ,पायदळ,आणि समुद्री आरमाराची उभारणी केली. यातून त्यांचे उत्तम संघटन कौशल्य आणि रणनीती दिसून येते.आपल्या सैन्यात सर्वांना सामावून मानाचे स्थान देऊन प्रस्थापित जातीभेदाच्या उतरंडी आणि भिंतीना हादरे दिले.ही गोष्ट त्या काळी साधारण नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणला.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर समता, बंधुता, न्याय, स्त्रिसन्मान आणि शेतकरी हित जोपासणारी स्वतंत्र व्यवस्था होती.
आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार तरुणांना आणि आदर्श राष्ट्र निर्मिती साठी प्रेरक आहेत.
एकीकडे,शिवाजीमहाराज,आदिलशाही,निजामशाही,
इत्यादी परकीय आक्रमणाला विरोध करत होते.लढत होते.जिंकत होते.त्यांचे संपूर्ण लक्ष स्वराज्य निर्मिती करण्यात केंद्रित असताना,दुसरीकडे त्यांना छुप्या आणि अंतर्गत स्वकीय शत्रूशी लढण्यात, प्रस्थापित वर्ण व्यवस्थेतील जाचक,आणि अपमान युक्त प्रथा बाजूला करण्यात त्यांची ताकद,शक्ती आणि काळ मोठ्या प्रमाणात वाया गेले,असे ऐतिहासिक दस्तऐवज यावरून स्पष्ट होते.
समाजासमोर मात्र या विषयी स्पष्ट चित्र येत नाही.
यावरून या ठिकाणी एक विचार सहज आठवला. नायजेरियन कादंबरीकार, कवी, प्राध्यापक आणि समीक्षक चिनुआ अचेबे यांनी एक अतिशय चांगला आणि योग्य विचार मांडला आहे – “जोपर्यंत हरीण स्वतःचा इतिहास लिहित नाहीत, तोपर्यंत हरणांच्या इतिहासात शिकारीच्या शौर्याच्या कथा गायल्या जात राहतील”.
किती गंभीर आणि नेमकी बाब चिनुआ अचेबे या विचारात मांडतात.
हा विचार इतिहासातील अनेक गोष्टींकडे निर्देश करतो. वर लिहिलेल्या या गोष्टीकडे प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने लक्ष दिले पाहिजे.
अनेक संशोधक,इतिहासकार,जाणकार,लेखक हे ऐतिहासिक घटना आणि महापुरुष यांच्याबद्दल लिहिताना पूर्वा ग्रहानुसार आणि तथ्य न जाणता,ऐतिहासिक पुरावे न वाचता समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात.अशा वेळी बऱ्याचदा खरा इतिहास किंवा ऐतिहासिक महापुरुष यांच्याबद्दल खरी माहिती, विद्यार्थी आणि सामान्य जनतेसमोर समोर येत नाही.
वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी,3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप वादग्रस्त आहे आणि इतिहासकारांच्या मते अनिश्चित आहे.ही बाब शिवप्रेमींनी क्लेशकारक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित मोठमोठे झेंडे घेऊन मिरवणूक निघते.सर्वत्र मोठ्या प्रमाणत जयंती अगदी उत्सव म्हणून साजरी केली जाते.पण शिवाजी महाराजांचा विचार आणि खरा इतिहास समोर येताना दिसत नाही.हे आपल्या सर्वांचे अज्ञान,दुःख की अजून काही!!?
महाराष्ट्रात सगळीकडे परीक्षा आणि अभ्यास असे वातावरण असताना अशा पद्धतीने समाज आपल्या महापुरुषांची जयंती साजरी करते.
ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.
चला,आपण आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास जाणून घेऊया.आणि आपला इतिहास परत एकदा खऱ्या स्वरूपात लिहूया.हा विचार आणि कृती खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आणि तोच खरा जयंती उत्सव असेल.उत्सव विचारांचा हवा.अंधभक्तीच्या देखाव्याचा,प्रचाराचा आणि प्रसाराचा नसावा.हीच खऱ्या शिवप्रेमींची इच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत