महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

जो जिंदगी भर इसलिए नही बोले की, बोलने पर मारे जाएंगे |

डॉ. आर.जे. इंगोले
जगात असे कांही विचारवंत आणि तत्ववेत्ते होऊन गेले की, त्यांनी एखादा दिलेला विचार हा संपूर्ण समाजाचे चित्र बदलू शकतो. म्हणजे कार्ल मार्क्स म्हणाला जगातील कामगारांनो एक व्हा आणि खरेच कामगार संघटित व्हायला सुरुवात झाली आणि आज सुद्धा अनेक क्षेत्रातील कामगार संघटना करतांना कार्ल मार्क्स यांचे विचार आणि जीवन याचा अभ्यास करतात. माहमानव डॉ. बाबासाहेब यांनी समाजाला दिलेल्या अनेक विचारांपैकी एक म्हणजे “शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा.” आणि आज आपण पाहतो की, तो आदर्श घेऊन समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेत आहेत आणि संघटित होऊन अनेक लढे देत आहेत. आणि असा संघर्ष करतांना ते डॉ. बाबासाहेब यांचे अनेक ठिकाणी विचार अंमलात आणतात. समाजाला शिक्षण नसेल तर आपली काय अवस्था होते आणि त्याचे महत्व काय आहे हे आपणास महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सांगितले आहे. आणि मग त्यांचा आदर्श घेऊन आज बहुजन समाजातील अनेक तरुण -तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. जगात अनेक देशात अन्यायाविरुद्ध बंड करण्यासाठी जे अनेक विचारवंत कारणीभूत आहेत त्यापैकी एक म्हणजे चे ग्वेरा आहेत आणि त्यांनी समाजाला स्पष्ट शब्दात सांगितले की, तुम्ही संघर्ष करण्यास घाबरू नका कारण तुम्ही घाबरले किंवा नाही घाबरले तरी तुमचे मरण अटळ आहे मग घाबरून का जगता तर लढून मरणे केंव्हाही श्रेष्ठ आहे. जसे आपले न्यायमूर्ती मा.कोळसे पाटील म्हणतात घरात अंथुरणात पडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मरणे केंव्हाही श्रेष्ठ आहे. अगदी तसेच आहे. आज आपल्या भारतीय समाजात अनेक क्षेत्रात सत्ताधारी लोक सामान्य लोकांवर अन्याय करतात आणि लोक तो सहन करतात याचे कारण त्यांना मरणाची भीती असते. पण चे ग्वेरा असे म्हणतात की, “ मैने कब्रस्तान मे उनकी भी कबरे देखी है , जो जिंदगी भर इसलिए नही बोले की बोलने पर मारे जाएंगे| ” म्हणजे याचा अर्थ काय आहे की, आपण मरणाच्या भीतीने अन्यायाविरुद्ध बोलत नाही पण नाही बोलले तरी मारले जाणार आहेत तर मग बोलणे केंव्हाही चांगले आहे. हा एक जीवन स्वाभिमानाने जगण्याचा विचार आपल्याला चे ग्वेरा देऊन गेले आणि फार मोलाचा संदेश आहे. म्हणजे आपल्या सर्व महापुरुषांचे शब्द वेगवेगळे असतील पण त्यातील विचार आणि शिकवण ही एकच आहे.
समाजात अनेक लोक असे असतात की, ते स्वाभिमान गहाण ठेवून आपले जीवन जगतात पण याला काही अर्थ नाही ज्यांना स्वाभिमान नाही त्यांचे जीवन मला वाटते एखाद्या जनावराप्रमाणे आहे. स्वाभिमान हे जीवनातील मोठे तत्व आहे जर स्वाभिमान नसेल तर आपले जीवन बेचव आहे. आणि अशा स्वाभिमानशून्य लोकांचे जीवन बघून कधी कधी फार किळस येते आणि हे कसे जगत असतील आणि समाजाला काय संदेश देतील ? आपल्या मुलांना काय संस्कार करतील ? असे प्रश्न नेहमी पडतात. आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी समाजाला उपदेश करतांना म्हणाले होते की, “ शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा.” याचा अर्थ स्वाभिमानी जगणे जास्त महत्वाचे आहे. आपल्याला ऐन तारुण्यात देशासाठी शहीद झालेला भगतसिंग का मोठा वाटतो तर तो स्वाभिमानाने देशासाठी फाशी गेला पण त्याचवेळी अनेक इतर लोक असतील त्यांनी हा मार्ग पत्करला नाही ते आपल्या लक्षात नाहीत. आज अनेक माध्यमे सरकार विरोधी म्हणण्यापेक्षा सत्य जे आहेत आणि त्यामुळे आज फार थोडे पत्रकार आहेत की, जे मरणाच्या भीतीने न जगता स्वाभिमानाने आपले जीवन जगत आहेत त्यांना धोका आहे पण त्यांनी तो स्वीकारला आहे. जसे गौरी लंकेश यांचा खून झाला तसे अनेक पत्रकार आज सत्य आणि परखड भूमिका घेत आहेत पण जेंव्हा हा पत्रकारांचा इतिहास लिहला जाईल तेंव्हा मात्र या निर्भीड पत्रकारांची दखल समाज घेईल आणि जे पत्रकार आज आपले कर्तव्य सोडून राजकीय सत्तेच्या पुढे पुढे करीत आहेत त्यांचा इतिहास हा गुलामीचा असेल यात शंकाच नाही. म्हणून कोणताही व्यक्ती जीवन किती वर्ष जगला यापेक्षा कसे जगला याला जास्त महत्व आहे. अनेक लोक 100 वर्ष जगतात म्हणजे आजची पिढी एवढे जगणार नाही पण जुने लोक इतकी वर्ष जगत होते. पण कितीही वर्ष जगले तरी तुम्ही जर स्वाभिमानाने जगले नाही तर त्याला अर्थ शून्य आहे. कारण या पृथ्वीतलावर मानव असा एकमेव प्राणी आहे की, जो स्वाभिमानाने जीवन जगू शकतो. कारण त्याला बुद्धी आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे अनेक मार्ग आहेत तसे इतर कोणताही प्राणी इच्छा असेल तरी असे जगू शकत नाही. मानवाने बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यांना आपल्या नियंत्रणात ठेवले आहे. पण मानवाला याची जाणीव नाही तर मानव हा लोभामुळे आणि लाभामुळे इतर मानवाचा गुलाम झाला आहे. आज आपण पाहतो की, राजकीय क्षेत्रात अनेक लोक असे आहेत की, त्यांना स्वाभिमान राहिला नाही. मागची राजकीय पिढी थोडी बरी होती. पण आज कोणता पक्ष आहे आणि त्याची कांही धोरणे आहेत आणि आपण तसे वर्तन केले पाहिजे असे कोणालाच वाटत नाही. कोणी कोणत्याही पक्षात प्रवेश करतात आणि कधीही करतात. याला काही विधिनिषेध नाही. आपण मागील काळात आपल्या देशात आणि राज्यात पाहिले असेल की, आपल्या कल्पनेच्या पलीकडे युती आणि आघाडी झाल्या आहेत. यामुळे मतदार सुद्धा गोंधळला आहे.
आपले शिक्षण क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. शिक्षण क्षेत्रात तर स्वाभीमानी लोक विशेषकरून शिक्षक असले पाहिजे पण आज असे झाले आहे की, उत्तर भारतात विशेषकरून दिल्ली विद्यापीठात हे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. तिकडे प्राध्यापक अनेक दबावाला बळी पडत आहेत. आणि त्यामुळे पुढील पिढी कशी तयार होईल याबद्दल शंका येत आहे. अनेक शिक्षकांना नको त्या बाबी सांगितल्या जात आहेत आणि प्राध्यापक सुद्धा ते मान्य करीत आहेत. म्हणजे तुम्ही वर्गात काय शिकवावे हे जर इतर बाहेरील लोक सांगत असतील तर मग शिक्षक वर्गाला स्वातंत्र्य कुठे आहे ? आणि मग असे प्राध्यापक काय पिढी घडवणार आहे ? याचा आज आपण विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक पगार मिळतो म्हणून कोणाचे काहीही ऐकतात आणि स्वत:चे मत मांडायला घाबरतात. आणि मग पुढील अनेक पिढया भित्र्या तयार होत आहेत. म्हणजे आपण एका फार मोठया संकटाकडे जात आहोत आणि याला थांबवायला कोणीच तयार नाही. जे आज होत आहे ते समाज पाहत आहे , शिक्षक पाहत आहे आणि सरकार सुद्धा पाहत आहे. कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे काम तेच करू शकतात ज्याला काही स्वाभिमान आहे आणि समाज घडवण्याची तळमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, “ जे मरणाला घाबरत नाहीत ते कधीच मरत नाहीत आणि जे मरणाला घाबरतात ते मेलेले असतात.” याचा अर्थ आज जे लोक मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करीत असतील जर ते सत्य बोलायला घाबरत नाहीत तर मग भारताच्या इतिहासात अमर आहेत आणि जे सत्य बोलायला घाबरतात किंवा त्यांना काही आमिष असल्यामुळे बोलत नाहीत ते सामान्य आहेत त्यांची दाखल इतिहास घेणार नाही. सामान्य माणसांनी कमीत कमी सत्य असणार्‍या लोकांच्या बाजूने जरी उभे राहीले तरी फार मोठे काम आहे. कारण ती सुद्धा एक भूमिका आहे. आणि अशी भूमिका आज काही लोक करीत आहेत यात काही राजकरणात आहेत आणि काही शिक्षण क्षेत्रात आहेत.तर कांही प्रा. लक्ष्मण यादव सारखे स्वाभिमानी आहेत त्यांना कामावरून काढून टाकले पण त्यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. आणि शेवटी मग असे हजारो प्राध्यापक असतील त्यांना इतिहास लक्षात ठेवणार नाही. पण जेंव्हा या शिक्षणक्षेत्राचा इतिहास लिहला जाईल तेंव्हा लक्ष्मण यादव यांचे नांव आदराने घेतले जाईल. कारण ते स्वाभिमानी आहेत. तसे पाहिले तर शिक्षण क्षेत्रात अशा व्यक्तींची कदर केली पाहिजे कारण पुढील पिढी तयार करणे हे फार जिकिरीचे काम आहे. आणि त्यासाठी असे अभ्यासू आणि स्वाभिमानी प्राध्यापक असावे लागतात. आपल्या देशाचा एक शिक्षण क्षेत्राचा मोठा गौरवशाली इतिहास आहे. आणि त्यामुळे याची जाणीव शासन आणि संस्थाचालक यांनी ठेवली पाहिजे. आज हजारो प्राध्यापक पात्र असूनसुद्धा बेरोजगार आहेत. आणि त्यामुळे पुढील पिढी कशी घडणार आहे ? आज मी पाहतो की, महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना फारसे काही येत नाही. मग पुढे ते अनेक परीक्षा देतात पण कुठेच यश मिळत नाही. आणि मग तरूणात नैराश्य येत आहे. आणि असेच सुरू राहिले तर पुढे याचा स्फोट होईल. याचे मूळ कारण जो प्राध्यापक वर्ग आज भर्ती केला जात आहे त्यात गुणवत्ता पाहिली जात नाही तर जवळचा ,नातेवाईक आणि विशेष म्हणजे जास्त पैसे देणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गुणवत्ता पार ढासळली आहे. हे मी आता त्या क्षेत्रात असल्यामुळे फार जवळून पाहत आहे. आणि यावर मी थोडे चिंतन केले तर माझ्या लक्षात आले आहे की, याचा दूरगामी परिणाम फार गंभीर होणार आहेत. कारण समाज पुढे जाण्यासाठी शिक्षण एकमेव पर्याय आहे. शिक्षण हे संपूर्ण सरकारच्या ताब्यात पाहिजे. पण आपल्याकडे सरकार शाळा आणि कॉलेजला मान्यता देते पण त्यावर खर्च करीत नाही. आणि फक्त शैक्षणिक धोरणे बदलून काय उपयोग ? अगोदर शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी बदला आणि शिक्षण क्षेत्रावरील खर्च वाढला पाहिजे. आज शिक्षण सम्राट मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या ते शिक्षणाकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आणि त्यामुळे सामान्य माणूस यापुढे शिक्षण घेऊ शकणार नाही आणि शिक्षण क्षेत्रात कितीही गुणवत्ता असली तरी तो साधा शिक्षक सुद्धा होऊ शकणार नाही. आणि स्वाभिमानी नागरिक तयार होणे तर फार दूर आहे. आणि सरकारला शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत हे साफ खोटे सांगतात. यावर साधा उपाय आहे जो विकसित देशांनी केला आहे. आपली कररचना बदला सर्व ठीक होईल आणि भरपूर पैसे शिल्लक राहतील. म्हणजे उद्योगक्षेत्रावर जास्त कर लावला पाहिजे आणि सामान्य लोकांवर कमी कर लावला की झाले, त्याला अर्थशास्त्रात प्रगतीशील कररचना असे म्हणतात. पण आपल्याकडे सरकार मग ते कोणतेही असो कमी जास्त हे उद्योगपतींचे धार्जिणे असतात. आणि 2014 नंतर तर या सरकारने कहर केला आहे जास्तीत जास्त कर सामान्य माणसावर आहे आणि उद्योग जगतावर कमी कर आहे. म्हणजे विकसित देशात या उद्योग क्षेत्रावर 40 ते 45 टक्के कर असतो आणि आपल्याकडे उलट आहे सामान्य लोकांवर जास्त कर आणि उद्योग क्षेत्रावर फार कमी कर आहे. यामुळे आर्थिक विषमता वाढते. आणि सरकारला शिक्षण ,आरोग्य ,रस्ते आणि पाणी अशा मूलभूत सोयीवर खर्च करता येत नाही. त्यामुळे निर्णय सरकारने घायचा आहे की, त्यांनी सामान्य माणसाचे कल्याण करायचे आहे का श्रीमंत लोकांना जास्त श्रीमंत बनवायचे आहे. कारण जास्त मतदान देशातील गरीब जनतेचे जास्त प्रमाणावर आहे ले लक्षात ठेवावे. आपली जनता जागृत नाही तोपर्यंत ठीक आहे पण एकदा जागृत झाली तर मग मोठे सत्ता परिवर्तन होईल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाकीत आहे. जनता जेंव्हा उच्च शिक्षित होईल आणि त्यांना ही सर्व व्यवस्था समजेल त्यावेळी जनता राजकीय साक्षर होईल आणि मग पुढे स्वाभिमानी होईल. एकदा स्वाभिमानी झाली की, मग ती मरणाला घाबरणार नाही. आणि मग चे ग्वेरा यांचे विधान सत्य होईल की, “ मैने कब्रस्तान मे उनकी भी कबरे देखी है , जो जिंदगी भर इसलिए नही बोले की बोलने पर मारे जाएंगे ” आणि मग सर्वच लोक अन्यायाविरोधात बोलू लागतील आणि एकदा सर्वच लोक बोलू लागले की, मग जनता संघटित होईल आणि आपल्या देशात एक नवी पहाट उजाडेल जी एक चांगला काळ घेऊन येईल जो सर्वसामान्यासाठी एक आशेचा किरण घेऊन येईल.
स्वाभिमानी माणसं कधी कोणाच्या पुढे पुढे करीत नाहीत ती आपली कर्तव्य नीट पार पडतात आणि जी माणसे आपली कामे नीट पार पडतात त्यांना पुढे पुढे करण्याची गरज पडत नाही. आपल्याकडे अनेक विभागात अशी माणसे असतात ती कामचुकार असतात आणि त्यामुळे त्यांना साहेबांच्या पुढे पुढे करावे लागते ,साहेब म्हणतील ती कामे करावी लागतात. आणि त्यांना अशी कामे करतांना त्यांच्या पदाचे भान सुद्धा राहत नाही. कारण त्यांना स्वाभिमान नसतो. मी एका महाविद्यालयात परीक्षेच्या कामासाठी गेलो होतो तिथे माझ्या ओळखीचे एक प्राध्यापक होते ते मला म्हणाले की, “ आपण चहा घेऊ.” मी म्हणालो ठीक आहे तर आम्ही चहाला निघालो आणि प्राचार्य समोर आले तर तो प्राध्यापक थोडा घाबरला आणि प्राचार्यांना म्हणाला, “ सर आम्ही चहा घेऊन येतो.” इथपर्यंत मला ठीक वाटले. पण आम्ही चहाला गेलो आणि त्यांनी प्राचार्यांना फोन केला आणि सांगितले की, त्यांना चहा घेऊन येतो आणि स्वत: चहा घेऊन आला आणि चहा प्राचार्य केबिनमध्ये घेऊन गेला हे मात्र मला आवडले नाही. आणि आता मला समजले की, हा स्वाभिमान शून्य माणूस आहे पण मी आजपर्यंत त्या व्यक्तीला फार चांगला समजत होतो. अशी माणसे जीवनात पैसा कमवतील पण स्वाभिमान नाही आणि पैशापेक्षा स्वाभिमान कितीतरी मोठा आहे. अर्थात स्वाभिमानी माणसाला काम करतांना मानसिक त्रास होतो पण तो ठीक आहे पण स्वाभिमान गहाण ठेवू नये. आपले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्यवस्थेने किती त्रास दिला आपणा सर्वांना माहीत आहे पण ते सतत स्वाभिमानी राहिले. आणि मग आपण काय आदर्श घेतला पाहिजे त्यांच्यापासून स्वाभिमान हाच घेतला पाहिजे. स्वाभिमानी ,माणसाला अनेक लोक एकटे पडतात तरी ठीक आहे आणि असेही ही झुंड काहीच कामाची नसते. ज्या समूहाला विचार नाही ,स्वाभिमान नाही ते काहीच कामाचे नाहीत. सोन्या-चांदीचे दागिने नसले तरी चालेल पण स्वाभिमान असला पाहिजे तो एक मोठा दागिना आहे. त्याआधारे आपण कोणतेही काम करून आपले जीवन जगू शकतो. पण मोठे पद आहे आणि स्वाभिमान नसेल तर काय कामाचे जीवन ? आज अनेक दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकांना कमावरून काढले जात आहे. ते प्राध्यापक आंदोलन करीत आहेत आणि व्यवस्था किती चुकीची आहे हे लोकांना दाखवून देत आहेत. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेवर जेवढे अन्याय होत आहे तेवढे इतर ठिकाणी नाही. त्याचे कारण आहे समाजाला जागृत करणारे एकमेव साधन हे शिक्षण आहे. आणि त्यामुळे हे सरकार 5 वर्ष रेशन फुकट देईल पण शिक्षण फुकट तर नाही पण स्वस्त सुद्धा करणार नाही. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या.भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करील आणि पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल. कारण शिक्षण मिळाले तर जनता जागृत होईल आणि मग जनता प्रश्न विचारेल आणि मग यांना सत्ता चालवणे अवघड होईल हे त्यांना चांगले माहीत आहे. यामुळे यांनी शिक्षणावर आघात केला आहे. शेवटी स्वाभिमानी माणूस कधीच झुकणार नाही याबद्दल एक शायर म्हणतो,

   मेरे लेहजे मे जी हुजूर न था,  और कोई मेरा कसूर न था |



                                                                             प्रा. डॉ. आर.जे. इंगोले 
                                                                           नाशिक ( 9423180876 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!